Saturday, 21 June 2025

भय सापळ्यातून मुक्त व्हा, मोह सापळ्यात अडकू नका.

पोपट कसा पकडतात माहीत आहे? खुप साऱ्या छोट्या छोट्या नळ्या एका दोरीत ओवतात, पोपटाला आवडेल असे खाद्य त्या नळ्यांना चिकटवलेले असते. त्याच्या वासाने पोपट तिथे जमा होतात. पोपट उडून येऊन त्यातल्या एखाद्या नळीवर बसला की त्या पोपटच्या वजनाने ती नळी त्यातून ओवलेल्या दोरीभोवती फिरते आणि पोपट त्या नळीला उलटा लटकतो. अशी अवस्था पोपटाने कधीच अनुभवली नसते, त्यामुळे पोपट त्या नळीला आपल्या पायांत घट्ट पकडून ठेवतो आणि लटकलेला राहतो. अशा वेळेला पोपटला भीती वाटते की नळीवरचे पाय सोडले तर तो खाली पडेल आणि दुर्दैवाने अशा विचित्र आणि कधीही न अनुभवलेल्या परिस्थितीमुळे त्याला त्याच्या पंखांमधल्या ताकदीचा, उडण्याच्या ताकदीचा विसर पडलेला असतो. आकाशात स्वच्छंद भराऱ्या घेणारा पोपट अशा प्रकारे पिंजऱ्यात अडकतो! याला म्हणतात भय सापळा!

माकड कसे पडकतात माहीत आहे का? ते एका अरुंद तोंडाच्या बाटलीत माकडाला आवडेल असा खाऊ ठेवलेला असतो आणि ती बाटली झाडाला घट्ट बांधतात. बाटलीची मान इतकी अरुंद असते की माकड हात आत घालून तो खाऊ पकडतो, पण त्यामुळे त्याची मूठ मोठी होते आणि त्या खाऊ सकट त्याचा हात बाहेर येत नाही आणि त्या माकडाला तो खाऊ सोडताही येत नाही. त्यामुळे ते हात सोडत नाही आणि ते माकड पकडले जाते. बाटलीतला खाऊ सोडून दिला तर ते माकड पकडले जाण्यापासून स्वत:ला वाचवू शकते, आणि ते सापळ्यात अडकते, पकडले जाते. हाच मोह सापळा! 

एखादी गोष्ट अथवा वस्तू आपल्याकडे आहे या भावनेने आपल्याला सुरक्षित वाटत असेल आणि, ‘ती गोष्ट अथवा वस्तू आपल्यापासून दूर गेली तर?’ या निव्वळ कल्पनेनेच आपल्याला भय वाटत असेल तर सर्व प्रथम त्या वस्तूचा अथवा गोष्टीचा त्याग करावा. काही काळ अस्वस्थ, निराधार वाटेल. पण अल्पावधीतच साक्षात्कार होऊ शकतो की आपण ज्याला आपली सर्वात मोठी कमजोरी समजत होतो, तीच आपली ताकद आहे! वेगळ्या शब्दांत सांगायचे तर त्या वस्तूचा अथवा गोष्टीचा मोह सोडून दिला पाहिजे कारण तो मोह हीच आपली कमजोरी असू शकते!

कुठले तरी हवे हवेसे वाटणारे क्षण, अनुभव हातातून सुटून जाऊ नये म्हणून ते घट्ट धरून ठेवायाचा प्रयत्न करताना आपल्या भोवती एक कोष तयार करत राहतो, ज्यात आपल्याला सोबत फक्त ते हवे हवेसे वाटणारे क्षण, अनुभव असतात. आणि आपण आपले सामान्य दैनंदीन आयुष्य जगत असतोच, पण ते या कोषात राहूनच. आणि त्यांच्या मुळे आपल्याला एक प्रकारच्या सुखाचा आभास होत राहतो, पण प्रत्यक्षात तो एक कोष नसून आपणच आपल्याच भोवती एक सापळा रचलेला असतो, हाच तो भय सापळा आणि मोह सापळा! ते सुंदर वाटणारे क्षण, अनुभव आपण घट्ट पकडून ठेवतो कारण ते क्षण, अनुभव जर निघून गेले तर काय होईल याला आपण घाबरत असतो. 

अशा वेळी आपल्या खऱ्या क्षमता, आपली खरी ताकद काय आहे याचा विसर पडतो आणि आपण तिथेच तिथेच घुटमळत राहतो. तो पिंजरा, तो सापळा तोडून बाहेर जाण्याचा आपण प्रयत्नही करत नाही! असं कोषात, भयात आणि मोहात अडकून राहण्याचे दुष्परिणाम घडत असतात पण आपले त्याकडे लक्ष जात नाही कारण आपण त्या दुष्परिणामांकडे फार गांभीर्याने पाहत नाही. अशा आभासी जगात राहत असताना काही चांगल्या संधी हातातून सुटून जाऊ शकतात.  
 
एखाद्या भावनेत अथवा विचारात अडकून राहिलं की कधीकधी खूप मोठी घुसमट होते. आणि अन्य चांगले पर्याय समोर असूनही दिसत नाहीत, ते झाकोळलेले आणि त्यामुळे दृष्टीआड राहतात, आणि कदाचित त्या घुसमटीतून बाहेर पडण्याची एखादी मोठी संधी हुकते! म्हणून सर्व प्रथम तो विचार अथवा ती भावना झटकून टाकली पाहिजे आणि अन्य पर्यायांसाठी मनाची कवाडं उघडली पाहिजेत. कोणताही पूर्वग्रह न ठेवता ‘कोरी पाटी’ घेऊन आशा पर्यायांकडे सकारात्मकतेने पाहिले पाहिजे. त्यांचा विश्लेषणात्मक विचार करून योग्य वाटतील ते एक अथवा अधिक पर्याय स्वीकारावेत. म्हणजेच भय आणि मोह सापळ्यांमधून मुक्त झाले पाहिजे, तरच आपण स्वच्छंद, मुक्त जीवन जगू शकू. 

थोडक्यात, भय सापळ्यात अडकायचं नाही आणि मोह सापळ्यातून मुक्त व्हायचे. ज्या गोष्टीच्या परिणामांची भीती वाटते तीच गोष्ट करायची, जय गोष्टीचा मोह वाटतो तीच गोष्ट सोडून द्यायची! यासाठी तीन आवश्यकता आहेत. एक, आपल्या स्वत:च्या क्षमतांवर दुर्दम्य विश्वास. दोन, आपण जे काही करतो, आपल्या कृती, ज्यावर आपले स्वत:चे नियंत्रण आहे, त्या सर्वांवर श्रद्धा आणि तीन, आपल्या नियंत्रणात नसलेल्या गोष्टींबाबत सबुरी. हे सारे आचरणात आणताना आपले लक्ष विचलीत करणारे क्षण नक्कीच येतील आपली वाट अडवायला. थोडा काळ विरंगुळा म्हणून तिकडे पाहण्यात हरकत नसावी पण त्यात गुंतून राहू नये, इंग्रजीत ज्याला to get indulged into  म्हणतात, तसे होऊ नये. म्हणजेच मोह सापळ्यात अडकू नये.

आता हे भय सापळ्यातून मुक्त होणे आणि मोह सापळ्यात न अडकणे यासाठी मला सापडलेला मार्ग म्हणजे ध्यान, ज्याला इंग्रजीत meditation म्हणतात, ते करणे. गेली दीड एक वर्षे, विशेषत: देहूला संत शिरोमणि तुकाराम महाराजांच्या गाथा मंदिरात सगळी आसक्ती गळून पडल्यापासून ध्यान करणे बऱ्यापैकी सातत्याने चालू आहे. आणि माझे नशीब थोर म्हणून मला ध्यान करण्याच्या काही विशिष्ट पद्धती ज्ञानी, आध्यात्मिक आणि गुरूतुल्य व्यक्तींकडून शिकायला मिळाल्या. त्या पद्धती आचरणात आणून ध्यान करणे चालू आहे. 

कुठल्याही भयाने ग्रासित न होता, कोणत्याही मोहात न अडकता मला माझा MEP Consultancyचा व्यवसाय प्रामाणिकपणे करता यावा, तो वृद्धिंगत व्हावा ही विठ्ठल चरणी प्रार्थना करून हा लेखनाचा उद्योग आजच्यापुरता थांबवतो. 

रामकृष्णहरी, पांडुरंगहरी, वासुदेवहरी!

-चेतन अरविंद आपटे 
दिवस एकशे त्र्यहत्तरवा पान एकशे त्र्यहत्तरवे
दिनांक २२/०६/२०२५ 
शौर्य दिवस