Sunday 10 September 2017

लेखनाच्या उद्योगामागची प्रेरणा

जानेवारी २०१७ पासून हा लेखनाचा उद्योग सुरू केल्यापासून मित्रवर्गाकडून बऱ्यापैकी कौतुक होतंय असं मला वाटतं (मित्रांनो, तसं नसेल तर कृपया परखड टिका करा. जेणेकरून मला लेखनात सुधारणा करता येतील!). या ब्लॉगमध्ये पाच सहा वेगवेगळ्या विषयांवर यथा मती लेखन केले ज्यावर संमिश्र प्रतिक्रिया आल्या आहेत. लहानपणी लिहिलेली एक कथाही ब्लॉगच्या स्वरूपात इथे आणून झालीय.

पण एक प्रतिक्रिया जी अनेकांकडून आली ती म्हणजे हा उद्योग चालू करावा असं मला का वाटलं? लेखन ही कला (लेखन ही कला आहे का? जाणकारांनी यावर प्रकाश टाकावा) माझ्यात कुठून आली? ही प्रतिक्रिया ब्लॉगवरील टिप्पणीमधे आली नाही तर व्यक्तिगत दुरध्वनी करून काही मित्रांनी हा प्रश्न मला विचारला. या व अशाच काही प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी परत एकदा हा लेखनाचा उद्योग!
 
ब्लॉग लिहावेत हे मला या वर्षी जानेवारीत सुचले, ते म्हणजे फुगेवाल्याचा किस्सा समाज माध्यमांवर लिहून झाल्यावर आणि त्याला आलेल्या प्रतिसादानंतर. त्याआधी ०१/०१/२०१६ रोजी नवीन वर्षाचा शुभेच्छा संदेश समाज माध्यमांवर लिहिला होता आणि ठरवलं होतं की दर महीन्याच्या एक तारखेला काहीतरी लेखन करेन. आणि नवीन वर्षांचे संकल्प जसे एक आठवड्यात बंद पडतात तसंच काहीसं झालं या संकल्पाचं आणि संपूर्ण २०१६ वर्ष काहीच लेखन झालं नाही!

पण लेखन करण्याची सुरुवात म्हणाल तर जानेवारी २०१६ किंवा जानेवारी २०१७ ही नव्हती. ती जाते सव्वीस वर्षे मागे म्हणजे जानेवारी १९९१ मध्ये जेव्हा रोजनिशी लिहायला सुरू केली होती. "विसाव्या शतकाची शेवटची दहा वर्षे राहिली" हे पहिले वाक्य होते त्या दिवशी. ही रोजनिशी लिहिण्यासाठी दिनांक छापलेली बाजारात मिळणारी डायरी न घेता माझ्या बाबाच्या सल्ल्यानुसार साधी शाळेत वापरतात तशी, त्यांच्याच शब्दांत सांगायचं तर बाळू वही घेतली आणि हाताने दिनांक लिहून रोजनिशी लिहिणे सुरू केले. त्याचे काही फायदे असे झाले की छापील डायरीत प्रत्येक दिनांकाला ठराविक जागा असते तेवढ्याच जागेत रोजचं लेखन करायचं अशी मर्यादा नव्हती आणि सलग, रोजचे रोज लेखन नाही झाले तर काही पाने मोकळी रहाण्याची शक्यता नव्हती. एक दोन दिवस लेखन झाले नाही तर पुढचं लेखन ज्या दिवशी होईल त्या दिवशीचा दिनांक आधीच्या लेखनानंतर टाकून सुरू करायचं इतकं सोपं होतं! अशा प्रकारे जवळपास सात आठ वर्षे म्हणजे १९९८ पर्यंत लेखन झालं. आता त्या वह्या कुठे आहेत, शोधाव्याच लागतील.

दरम्यानच्या काळात मी स्थापत्य अभियंता (Civil Engineer) आणि व्यवसाय प्रशासन विशेषज्ञ (MBA) झालो (शुद्ध मराठीत लिहिण्याचा अट्टाहास असला की काही इंग्रजी शब्दांना उगाच अवघड मराठी प्रतिशब्द लिहिले जातात ते असे!), आणि व्यवसायात स्थिरावलो होतो.  दरम्यानच्या काळात "दोन लग्नांची गोष्ट" लिहून झाली होती. तेव्हा तीही एका साध्या वहीतच लिहीली होती. त्यानंतर अजून एक कथा लिहीली होती, अशीच दुसऱ्या एका वहीत. त्या कथांबद्दल इथे वाचा. मग व्यावसायिक आयुष्यातल्या जबाबदाऱ्यांमुळे लेखन फक्त बैठकीचं इतिवृत्त अर्थात minutes of meeting लिहिण्यापुरतं मर्यादित राहीलं होतं आणि त्यामुळे बरंच रुक्ष झालं होतं! तरीही २००५ साली कोकणात जाऊन आल्यावर पुण्यातून गुहागरला राज्य परिवहन मंडळाच्या बसने कसं जायचं, जवळपास बघण्यासारखं काय काय आहे याबद्दल माहिती देणारा एक ब्लॉग लिहिला होता, काही प्रकाशचित्रांसकट. मग फेसबुक सारखी समाज माध्यमं हाताशी आल्यावर थोडा जास्त वाव मिळाला लेखनाला, तरी त्यालाही मर्यादा आहेच.

या वर्षाच्या सुरुवातीला स्फुट लेखन करणं जरा गंभीरपणे घेतलं आणि नवीन वर्षांचा जरा मोठा शुभेच्छा संदेश समाज माध्यमांवर लिहिला. त्यानंतर गुगलच्याच खात्यातून ब्लॉग लिहिण्याच्या या संकेतस्थळाचा वापर करता येतो आणि त्यासाठी मोबाईल ॲप आहे याचा साक्षात्कार झाल्यावर ठरवूनच टाकलं हे माध्यम वापरायचं आणि बऱ्यापैकी नियमित लेखन चालू झालं. पुढचा प्रश्न होता ब्लॉगला नाव काय द्यायचं हा. आपण सतत काही ना काही उद्योग करत असतो, त्यातलाच हा अजून एक उद्योग म्हणून या मराठीतल्या ब्लॉगचं नाव लेखनाचा उद्योग असं. ठेवलं! गेल्या एप्रिलमध्ये एका मोठ्या सुट्टीवर मध्य प्रदेशात गेलो होतो. त्या सहलीचे प्रकाशचित्रे नुसतीच समाज माध्यमांवर प्रसारित करण्यापेक्षा प्रवासाचा अनुभव आणि भेट दिलेल्या स्थळांची माहिती, रस्त्यांची माहिती अशा स्वरूपाचा ब्लॉग लिहायचं ठरवलं. मोठ्या जनसमुदायाला उपयोग व्हावा म्हणून या ट्रॅव्हल डायरीज इंग्रजीतून लिहिल्या.

तर अशा प्रकारे हे लेखन सुरू राहिलंय गेले आठ नऊ महिने. ते कायम सुरू राहील अशी अपेक्षा आणि इच्छा ठेवून आजच्या पुरता हा लेखनाचा उद्योग संपवतो.

दिवस दोनशे त्रेपन्नावा पान दोनशे त्रेपन्नावे

मुलुंड मुंबई
१०/०९/२०१७