Sunday 31 December 2017

काय दिलं २०१७ ने?

काय दिलं २०१७ ने? बरंच काही! 

माझ्या देशाची पत आंतरराष्ट्रीय मंचावर खूपच सुधारली. त्या सुधारणेचा आलेख चढताच आहे आणि चढताच राहील! राष्ट्रीय पातळीवर काही महत्वपूर्ण आर्थिक निर्णय आणि बदललेली कररचना यांचाही हातभार लागला यात. आता काही मूलगामी बदल केले की त्याचे बरे वाईट परिणाम होतात, तसे या बदलांचेही झालेत. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, की दुचाकी किंवा चारचाकी गाडी वळवणे सोपे असते पण लोहमार्गावरून जाणारी ट्रेन रूळ बदलताना रुळांचा आवाज होतोच. त्याचप्रमाणे सवाशे कोटी लोकसंख्येच्या देशाची घडी व्यवस्थित बसवताना थोडी खडखड, थोडा कोलाहल होणारच! तरीही एकंदरीत माझ्या देशाचं भविष्य उज्ज्वल आहे हे कोणीही मान्य करेल.  

गेल्या वर्षीपर्यंत काहीशे कोटी रुपयांची गोष्ट करणारी चित्रपट सृष्टी "बाहुबली द कन्क्लुजन" या अतिभव्य चित्रपटामुळे हजारो कोटी रुपयांच्या गोष्टी करू लागली. बेचाळीस वर्षांपूर्वी जसा "शोले" ट्रेंड सेटर होता तसाच यंदा "बाहुबली द कन्क्लुजन" हा चित्रपट ट्रेंड सेटर ठरला. एक पडदा चित्रपट गृह असो वा मल्टिप्लेक्स, सगळीकडे याने गर्दी खेचली. परदेशांत तेथील स्थानिक भाषांतही हा चित्रपट प्रसिद्ध झाला. 

मराठी चित्रपटांबद्दल बोलायचं तर वर्षाच्या सुरुवातीला आलेला "ती सध्या काय करते?" बराच लक्षवेधी ठरला. शाळकरी वयात निर्माण झालेलं प्रेम तारुण्यातही, दोघांचे मार्ग वेगवेगळे झायावरही कसं टिकू शकतं याचं छान चित्रण होतं यात. तीन वेगवेगळ्या कलाकारांनी एकाच पात्राची वेगवेगळ्या वयातील भूमिका करण्याचा प्रयोग यशस्वी झाला असंच म्हणता येईल. याच बरोबर फास्टर फेणे, बापजन्म, हृदयांतर, मुरांबा, कच्चा लिंबू या सारखे भरपूर आशयघन मराठी चित्रपट या वर्षात आले आणि त्यांनी प्रेक्षकांची पसंती मिळवली.

भारतीय क्रिकेटपटुंच्या आयुष्यावर एकूण तीन चित्रपट प्रदर्शित झाले गेल्या दोन तीन वर्षांत. पैकी दोन चित्रपटांत वेगवेगळ्या अभिनेत्यांनी त्या त्या क्रिकेटपटुंच्या भूमिका केल्या पण क्रिकेटच्या देवाची भूमिका कोण करणार? मग चित्रपट बनवताना तो देवच शतकोटी स्वप्ने घेऊन रुपेरी पडद्यावर अवतरला!

दूरचित्रवाणीवरही या वर्षात खूप नवे प्रयोग झाले. वर्षानुवर्षे चालणाऱ्या दैनंदिन मालिकांना कंटाळलेल्या प्रेक्षकांना मिनी सिरीज या प्रकाराशी ओळख करून दिली ती रुद्रमने. भक्कम कथानकासह अनेक जमेच्या बाजू असलेली ही मालिका ७० - ७५ भागांचीच होती. नजीकच्या भविष्यात अशा अजून मालिका बघायला मिळतील अशी आशा करूया. या मालिकेमुळेच मित्र परिवारातही थोडी वाढ झाली. 

या मालिकेबद्दल लिहिलेल्या ब्लॉगपोस्टमुळे हा लेखनाचा उद्योग थोडा जास्त लोकप्रिय झाला. आणि त्यामुळे हा उद्योग चालू ठेवण्याचा उत्साहही वाढला. मी काही सिद्धहस्त वगैरे लेखक नाही. जे मनाला भावते किंवा टोचते ते साध्या सोप्या शब्दांत मांडतो इतकंच. सुदैवाने चांगला वाचकवर्ग या ब्लॉगला मिळालाय त्यामुळे हा उद्योग मी चालू ठेवणार आहे. 

या वर्षात आणखीन एक नवीन उद्योग सुरू केला, सुरु झाला असं म्हणणं जास्त योग्य ठरेल. आयुष्यात पहिल्यांदाच शिक्षक झालो. एक नवं दालनच उघडलं! आता हा उद्योगही बाळसं धरतोय. या बद्दल सविस्तर परत कधीतरी. 

तर एकंदरीत २०१७ या वर्षाने अनेक चांगले अनुभव दिले, उमेद दिली, उत्साह दिला आणि मित्र दिले. येणारे वर्ष, तुम्ही कोणत्याही वयाचे असलात तरीही अठराच वर्षे वयाचे आहात याची आठवण करून देणारे आहे. २०१८ म्हणजे looking 20 feeling 18 असंच काहीसं नाहीये का?

या वर्षरुपी पुस्तकाच्या दिवसारूपी पानांवर खूप काही लिहिले गेले आणि ते कायम स्मरणात राहील. या पुस्तकाची थोडी पाने चाळल्यावर काही चांगल्या वाईट गोष्टी सापडल्या, त्यांची आठवण सोबत ठेवून वर्षभर उघडे असलेले हे ३६५ पानांचे पुस्तक आज मिटत आहे. पुढील वर्षी नवीन आशा आकांक्षा घेऊन अजून एक कोरे पुस्तक उघडायचे आणि त्याच्या प्रत्येक पानावर काही ना काही लिहायचे, अशी इच्छा ठेवून आजच्यापुरता आणि या वर्षापुरता हा लेखनाचा उद्योग थांबवतो!

दिवस तीनशे पासष्टावा पान तीनशे पासष्टावे!

३१/१२/२०१७ 
मुलुंड मुंबई



Monday 11 December 2017

मैत्र जीवाचे: पाच वर्षे, तेहेतीस वर्षे, चार वर्षे

हा लेखनाचा उद्योग, हा ब्लॉग जरा जास्त मोठा झालाय. ४२ वर्षांचा मागोवा घ्यायचा म्हणजे लांबी वाढणारच. कृपया सयंमाने वाचावा ही विनंती!!

सन १९७५. दादर मुंबई.

त्या वर्षीचा दसरा होता. माझ्या बालमोहन विद्यामंदिर शाळेच्या प्रथेप्रमाणे वयाची अडीच वर्षे पूर्ण झाल्यानंतरच्या दसऱ्याला शाळेत प्रवेश घेतला होता. माझे बाबा याच शाळेचे विद्यार्थी. सहाजीकच माझी मोठी बहीण आणि मी, दोघेही बालमोहनमध्येच जाणार हे ठरलेलं होतं! पहिल्या दिवशी आई बाबा दोघेही आले होते मला शाळेत सोडायला. दसरा सण मोठा म्हणून जरा नव्यातले कपडे घालून गेल्याचं आणि शाळेसमोर शिवाजीउद्यानाच्या, नवीन प्रचलित नावानुसार 'शिवतिर्थाच्या' कट्ट्यावर बसून रडून झाल्याचं आज ४२ वर्षांनंतरही आठवतंय. शाळेच्या प्रथेप्रमाणे "छोटा शिशू" या वर्गात माझा प्रवेश झाला होता आणि एक नवं विश्व सामोरं आलं होतं. 

ग म भ न गिरवायला सुरुवात झाली होती, "श्री"काराशी ओळख झाली होती, अक्षर ओळख व्हायला लागली होती. मधल्या सुट्टीत डब्यातला खाऊ खाणे हा एक नवा उद्योग मागे लागला. मला त्या वयात पोळीला भाजी लावून खाण्यात जास्त वेळ लागत असे. म्हणून आईने एक शक्कल लढवली. पोळीमध्ये भाजी भरून त्याचा रोल, गुंडाळी करून दिली डब्यात. त्यामुळे मधल्या सुट्टीत डबा पुर्ण संपून "ओता ओती" करायला वेळ शिल्लक राहू लागला. नाहीतर शिपाई वर्ग झाडायला आला तरी आमची स्वारी पोळी भाजीच खात असायची! 

तर "ओता ओती" हा एक पाण्याशी खेळायचा प्रकार होता. एका बादलीत पाणी असे ते एका प्लास्टिकच्या तपेलीत घेऊन बाटलीत भरणे असा साधा खेळ होता. पण त्या तपेलीतले पाणी बाटलीत सरळ पडेल तर शप्पथ! थोडे पाणी बाटली ज्यावर ठेवलेली असे त्या लाकडी घडवंचीवर (स्टुल), थोडे जमीनीवर, थोडे अंगावर सांडून उरलेच तर बाटलीत पाणी जात असे. या खेळात एक साधी शिकवण होती. निमुळत्या तोंडाच्या बाटलीत पाणी भरायचं असेल तर बाटलीच्या तोंडात जाईल अशी नळी असलेलं आणि त्याचं स्वत:चं तोंड बाटलीच्या तोंडापेक्षा मोठं असेल असं काहीतरी पाहीजे. मग ताईंनी येऊन बाजूलाच असलेलं नरसाळं म्हणजे फनेल त्या बाटलीत अडकवायला सांगितलं. त्यानंतर या ओता ओतीच्या खेळात वेगळीच मजा यायला लागली. त्या नरसाळ्याची नळी बाटलीच्या तोंडापेक्षा लहान असल्यामुळे बाटलीतून परत बादलीत पाणी टाकताना नरसाळं बाटलीला उलटं लावून, म्हणजे नरसाळ्याची नळी बाहेर ठेवून बादलीत पाणी ओतायला सुरुवात केली. आणि अरुंद नळीतून जास्त जोरात पाणी येताना पाहून मजा यायला लागली! लहानपणी पाण्यात खेळायला मला खुप आवडत असे. मोठेपणी पाण्याशी संबंधितच काही काम करेन याचीच ती नांदी होती का? तर छोटा शिशू वर्गातून मोठा शिशू या वर्गात गेल्यावर बादलीही मोठी झाली आणि मग बाटलीच पाण्यात बुडवून भरायचा "शॉर्टकट" लक्षात आला!! आणि बाटली बादलीत बुडवून त्यात पाणी भरताना येणाऱ्या बुडबुड्यांच्या आवाजाची मजा यायची. 

या सगळ्या शिक्षणाबरोबर आणि खेळण्याबरोबर नवीन मित्र मैत्रीणीही बनत होते. त्यांच्याबरोबर खेळणे चालू होते. शाळा सुटल्यानंतर आई किंवा बाबा घरी न्यायला येईपर्यंत शाळेच्या इमारतीभोवतीच्या अंगणात पकडापकडी खेळण्यात वेळ मस्त जायचा. शाळेपासून लांब माहीम आणि वरळी या भागात रहाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बसची व्यवस्था केली होती. बाकी शिवतिर्थाच्या आसपास रहाणारी माझ्यासारखी मुलं चालतच ये जा करत शाळेत, अर्थात आपापल्या पालकांसोबत! शाळा सुटल्यानंतर बसने जाणारी मुलं गेल्यावरही उरलेल्या मुलांचं खेळणं, त्यांचे पालक आल्यानंतरही चालूच असे.

आमच्या वर्गात एक टॉमबॉईश (याला मराठी प्रतिशब्द नाही मिळाला मला!) मुलगी होती, त्या वयातल्या मुलींच्या सरासरी उंची पेक्षा जरा जास्त उंच आणि मुलींचे कपडे न घालता मुलांसारखे कपडे घालणारी. शिक्षकांची बोलणी खाऊनही काहीही फरक पडत नसे त्यात! बालवर्गापर्यंत गणवेष नव्हता. पण पहिलीत गेल्यापासून गणवेष सक्तीचा झाल्यावर हा प्रकार बंद पडला.  

इयत्ता पहिलीच्या आधीच्या वर्गांना आमच्या बालमोहन विद्यामंदिरात छोटा शिशू वर्ग, मोठा शिशू वर्ग आणि बालवर्ग असं म्हणतात. आणि हे वर्ग शिवतिर्थाच्या समोरच्या जुन्या इमारतीत होत असत. जिथे बालमोहन विद्यामंदिरचे संस्थापक आणि शिक्षण महर्षी कै. दादा रेगे याचं निवासस्थानही होतं तेव्हा. या इमारतीतल्या खोल्यांमध्ये काही तास होत असत तर काही तास अंगणात. इमारतीच्या कुंपणाला धरून काही वाफे होते ज्यात फुलझाडं होती. बालवर्गात असताना एकदा आमचा एक तास असाच त्या अंगणात होता. सगळी मुलं तीन रांगामधे शांतपणे बसून (हे अशक्य वाटत असलं तरी खरं आहे बरं का!) शिक्षकांची वाट पहात होती. नाही म्हणायला थोडी चुळबुळ चालू होती पण दंगा नव्हता. मी तेव्हा त्या वाफ्यांच्या सगळ्यात जवळ म्हणजे कुंपणाजवळ बसलो होतो आणि माझ्यापुढे तीन चार ओळी सोडून बसलेल्या एका मुलाकडे त्याच्या एका विचित्र कृतीमुळे माझं लक्ष गेलं. काही तरी चघळून तो बाजूच्या वाफ्यात थुंकला आणि त्या थुंकीचा रंग हिरवा होता. बहुदा बाजूच्या वाफ्यातल्या झाडाची पाने खाल्ली असावीत. मला हे तेव्हा काही कळलं नाही आणि मी त्यानंतर बराच वेळ हिरवी थुंकी काढायचा प्रयत्न करत बसलो होतो!

माझा जन्म गौरीपुजनाच्या दिवशीचा असल्यामुळे वाढदिवस गणेशोत्सवाच्या आसपासच येतो बरेचदा. तर बाल वर्गात असताना बहुदा ऋषीपंचमीला माझा वाढदिवस आला होता. नवीन कपडे घालून मी शाळेत गेलो होतो. गणेशोत्सव चालू असल्यामुळे रोजच्या प्रार्थने बरोबर गणपतीची आरती आणि नंतर "घालीन लोटांगण...." हे भजनही व्हायचं. मला आठवतंय, त्या दिवशी माझा वाढदिवस म्हणून आणि मी विनंती केली म्हणून या भजनातल्या शेवटच्या " हरे राम हरे राम, राम राम हरे हरे, हरे कृष्ण हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे" या ओळी दोनदा म्हणण्याऐवजी तीन वेळा म्हटल्या गेल्या होत्या…... 

अशी धमाल मस्ती करत बालवर्गातून पहिलीत आलो आणि वर्गातल्या मुलांबरोबर मैत्री अधिकच घट्ट व्हायला लागली होती. पहीलीपासून दहावीपर्यंतचे वर्ग मधुकर राऊत मार्गावरच्या नवीन इमारतीत भरतात. या इमारतीला मोठी शाळा म्हणत आणि शिवतिर्थासमोरील इमारतीला छोटी शाळा म्हणत. ही मोठी शाळा घरापासून थोडी जवळ होती छोट्या शाळेपेक्षा. माझा वर्ग आणि माझ्या मोठ्या बहिणीचा वर्ग भरण्याची आणि सुटण्याची वेळ एकच असे मग आम्ही एकत्र चालत शाळेत जात येत असू. आमच्या बरोबरच आमच्याच इमारतीत रहाणारी माझी एक बालमैत्रीणही शाळेत जात येत असे. त्यामुळे आमच्या आईबरोबरच तिच्या आईचाही आम्हाला शाळेत नेण्या आणण्याचा त्रास वाचला होता.

पहीलीत असताना सतरंजीवर बसून समोरच्या बाकाचं झाकण उघडून त्याच्या आत दप्तर आणि डबा ठेवायची पद्धत होती. काही वर्गमित्र दप्तरात खाऊचा डबा आणि पाण्याची बाटली घेऊन येण्याऐवजी हातात धरायची छोटी कडी असलेल्या प्लास्टिकच्या छोट्या पिशवीत (आज आपण ज्याला कॅरी बॅग म्हणतो तशी पिशवी नव्हे) डबा बाटली आणत असत. ते बघून मी आईकडे तशीच एक बास्केट मागितली आणि ती लगेच मिळाल्या मुळे मीही खुश झालो होतो. तर मधल्या सुट्टीत या बास्केट मधून डबा काढून खाण्याची मजा वाटत असे आणि डबा खाण्याचा वेगही थोडा वाढला होता. त्यामुळे पोळी भाजीची गुंडाळी बंद झाली होती. मित्र मैत्रीणींमध्ये डबा वाटून खाणं सुरू झालं होतं. एखाद्या मित्राला किंवा मैत्रीणीला एखादी भाजी आवडते म्हणून ती भाजी दुसऱ्या कोणी डब्यात आणायची असंही कधीकधी होत असे. डबा खाताना एकदा एका मित्राशी वाद झाला होता पोळी कोणती आणि चपाती कशाला म्हणायचं या वर! डबा खाऊन झाल्यावर खेळायला जाण्यात मात्र काहीही फरक पडला नव्हता. असंच एकदा मधल्या सुट्टीत मी आणि एक मित्र भिंतीवर रंगवलेल्या भारताच्या नकाशासमोर उभे होतो. त्याने "गया" या शहराच्या नावाकडे बोट केले आणि तो तिथून निघून गेला! बहुदा "मैं यहांसे गया!" असं सांगायचं होतं त्याला. तो मित्र तिथून गेला तो चार वर्षांपूर्वी भेटला एकदम!!

एकदा शाळा सुटताना माझ्या बुटाची नाडी सुटली होती आणि मला ती व्यवस्थित बांधता येत नव्हती. तेव्हा एका मित्राने ती बांधून दिली. त्याने नाडी इतकी विचित्र प्रकारे बांधली की घरी आल्यावर नाडी सोडवण्यात बराच वेळ आणि शक्ती खर्ची पडली होती!

दिवाळीच्या सुट्टीतला अभ्यास आणि त्यासाठीची खास वही हा दिवाळीतल्या फटाक्यांइतकाच आकर्षणाचा विषय असे. दिलेला अभ्यास करणे आणि त्या जोडीला ती वही छान छान नक्षी काढून आणि काही रंगीत चित्रे चिकटवून सजवणे हा प्रकारच अभ्यासापेक्षा जास्त आवडत होता.  एकमेकांच्या वह्या आणि त्यांची सजावट पहाणे हा सुट्टीनंतर शाळा परत चालू झाल्यावरच्या पहिल्या दिवसाचा कार्यक्रम ठरलेला असे.

शाळेची वार्षिक सहल (जी आम्ही वर्ग मित्र मैत्रीणी अजूनही आयोजित करतो) ही म्हणजे एक पर्वणीच असे. शाळेच्याच बसमधून ही सहल जात असे. दुसरीतली सहल गेटवे ऑफ इंडियाला गेली होती आणि माझं नशीब थोर म्हणून जाताना दादासाहेब रेग्यांच्या शेजारी बसायची संधी मिळाली होती! त्यांचा शेजारी बसण्याचा आनंद वर्णन करायाचा नसतो, फक्त अनुभवायचा असतो!! आमच्या पिढीचं नशीब महान म्हणूनच आम्हाला त्यांच्यासारखे मुख्याध्यापक मिळाले!!! ज्या बसमध्ये दादा असत त्यातली सगळी मुलं आणि मुली एकदम चिडीचुप. बाकीच्या बसमधल्या मुलांना बडबड करायला बऱ्यापैकी मोकळीक असे. गेटवेला पोहोचल्यावर समुद्राकडे बघून, "केवढा मोठा समुद्र. पाणीच पाणी. अबब किती हे पाणी!" हे दादांचे शब्द अजूनही कानात घुमतायत!! त्या सहलीत एका मित्राला प्रश्न पडला होता, "भाऊचा धक्का कुठे आहे?" गेटवेच्या जवळ जो दिपस्तंभ आहे समुद्रात त्याच्याकडे हात करून दिले ठोकून, " तो बघ भाऊचा धक्का." वास्तविक भाऊचा धक्का म्हणजे काय आणि तो गेटवेवरून दिसतो का नाही हे मला तेव्हा काहीही माहीत नव्हते!

उन्हाळी सुट्टीच्या आधी कैरीचं पन्हं आणि कलिंगडाची फोड, श्रावणी सोमवारी चणे फुटाणे विद्यार्थ्यांना देण्याच्या काही छान प्रथा आहेत शाळेच्या! शाळेच्या विद्यार्थ्यांना सर्व शिक्षक स्वत:च्या मुलांप्रमाणेच वागवत असत. आज या आठवणींनीही भरून येतं!

सन १९८०. दादर मुंबई

दुसरीतून तिसरीत जाताना काही कारणास्तव आम्ही मुंबई सोडून गेलो. तेव्हा हे सगळे मित्र मैत्रीणी परत कधी भेटतील का? कुठे भेटतील? नवी शाळा कशी असेल? तिथेही असेच मस्त मित्र मैत्रीणी मिळतील का? असे प्रश्न पडण्याचं आणि त्यांची उत्तरं शोधण्याचं ते वय नव्हतं. आई बाबांनी नेलं तिथे आम्ही गेलो!

चौथीत असताना एकदा दादरला एका लग्नाला आलो होतो. तेव्हा शाळेत गेलो असताना चौथीच्या वर्गाच्या दारात उभा राहीलो. एका मित्राने लगेच ओळखलं मला, "हा चेतन आपटे, दुसरीत होता वर्गात!" त्या तासाच्या ताईंनी वर्गात बोलवण्याआधीच मी तिथून धूम ठोकली होती.

मी पुण्यातल्या भावे हायस्कूलमधे शिकत मोठा होत होतो आणि हे बालमोहनचे बालमित्र मुंबईत मोठे होत होते. सातवीत का आठवीत असताना एकदा अचानक बालमोहनची एक बालमैत्रीण पुण्यात भेटली होती. काय बोललो तिच्याबरोबर हे आता एवढं आठवत नाही पण आनंद नक्कीच झाला होता!! 

मी इंजिनिअर झालो, कारकिर्दीत स्थिरावलो, तसे हे सगळे बालमित्रमैत्रीणीही आपापल्या व्यावसायिक आयुष्यात स्थिरस्थावर झाले, कोणी परदेशी गेले. पण मी मुंबईत नसल्याने माझा संपर्क तुटल्यातच जमा होता यांच्याशी. पण काही नावं मला आठवत होती. एक मैत्रीण मधुकर राऊत मार्गावरच्या शाळेच्या इमारतीशेजारील दुसऱ्या एका इमारतीत रहात असे. आमचे पुण्यातील एक स्नेही आणि शेजारी त्यांच्या नोकरीनिमित्त दादरला मधुकर राऊत मार्गावरच अन्य एका इमारतीत रहात असत. त्यांना भेटायला गेलं असताना या मैत्रीणीची आठवण आली. ती मैत्रिण त्यावेळेसही तिथेच रहात असे हे काही तेव्हा माहीत नव्हतं. लहानपणी तिच्याकडे खेळायलाही गेलो होतो अनेकदा.

नोव्हेंबर २००७, पुणे.

असं सगळं सुरळीत चालू असताना मी नोकरीसाठी पुन्हा मुंबईत आलो. तेव्हाही काही कल्पना नव्हती की या बालमित्र मैत्रीणींबरोबर परत संपर्क साधला जाईल. 

इंटरनेटवरील समाज माध्यमे भारतीय जनमानसात रुढ आणि प्रचलित होण्याचा तो काळ होता. त्यामुळे आपल्यापासून दूर असणाऱ्या आपल्या स्नेहीजनांशी या समाज माध्यमांतून संपर्क साधणे सोपे होत होते. याचाच फायदा घेत मी पुण्याच्या भावे हायस्कूलमधल्या आणि मुंबईच्या बालमोहन विद्यामंदिरातल्या सवंगड्यांपैकी बहुतेकांना शोधून काढलं. 

जुन २०१३, मुंबई

बहुतेकांची चाळीशी ओलांडली होती किंवा काही महीने बाकी होते. त्यावर्षी आम्हाला दहावीची परीक्षा उत्तीर्ण होऊन २५ वर्षे झाली होती. समाज माध्यमांतून पुन्हा ओळख झालेल्या एका मैत्रीणीने (तीच, पुण्यात भेटलेली) मला दूरध्वनी करून सांगितलं की आपल्या दहावीच्या वर्गाच्या रौप्यमहोत्सवी वर्षाबद्दल स्नेहसंमेलन आयोजित केलंय. त्याची जागा आणि वेळ तिने मला सांगितली आणि मी लगेच होकार भरला. ते स्नेहसंमेलन अविस्मरणीय होतं! प्रचंड मोठ्या कालावधीनंतर परत एकदा जुन्या सवंगड्यांबरोबर संपर्क साधला जात होता. परत एकदा नवे स्नेहबंध निर्माण होत होते. परदेशी असलेले, मुंबईबाहेर स्थायिक झालेले बरेच वर्गमित्र या कार्यक्रमासाठी खास मुंबईत आले होते. 

बहुतेकांसाठी ती २५ वर्षानंतरची पहिली भेट होती पण माझ्यासाठी ती भेट ३३ वर्षांनंतरची होती. मला आश्चर्य वाटलं की एवढ्या काळानंतरही आमच्या आठवणी पुसट झाल्या नव्हत्या. पहिलीत असताना शाळेत वह्या नसत. रोजचा अभ्यास पाटीवर होत असे शाळेत. बहुतेकांच्या पाट्या काळ्या रंगाच्या होत्या पण माझी पाटी हिरवी असल्याची (जे माझ्याच लक्षात नव्हतं) आठवण याच स्नेहसंमेलनात अनेकांनी सांगितली. दुसरीतला भाऊच्या धक्क्याचा किस्सा मी सांगितल्यावर सगळ्यांना मजा वाटली!

हे समेंलन फक्त आमच्या वर्गाचे होते. पण लगेच महिनाभरात सन १९८८ मध्ये बालमोहनमधून दहावी उत्तीर्ण झालेल्या सर्व तुकड्यांचे एक मोठे समेंलन झाले, ज्यात अनेक शिक्षकही आले होते. तोही एक सुंदर अनुभव होता. सर्व शिक्षकांप्रति आदर व्यक्त करण्याची ती एक सुंदर संधी होती! काही जणांनी कला आणि अभिनय क्षेत्रातही नाव कमावलंय हेही तेव्हा समजलं. 

एक मित्र त्याच्या लहानपणी पुण्यात भावे हायस्कूलला होता, तो मुंबईत बालमोहनला आला आणि त्याच वर्षी मी भावे हायस्कूलला प्रवेश घेतला. पण गमंत म्हणजे त्याच्याशी भेट तेव्हा न होता या समेंलनांमध्ये झाली. दुसऱ्या एका मित्राचा डहाणूला कुक्कुटपालन व्यवसाय आहे. या दोन समेंलनांनंतर त्याच्या कुक्कुटपालन केंद्राजवळच्या घरी सहल झाली दोन दिवसांची. तेव्हा त्याने त्याच्या व्यवसायाची आणि हे केंद्र कसं चालवलं जातं याची भरपूर माहीती दिली. ज्याला आपण एक्झॉटिक व्हेजिटेबल्स म्हणतो अशा भाज्या वितरणाचा एका मित्राचा व्यवसाय आहे. तो शाकाहारी मित्रांसाठी काही भाज्या घेऊन आला होता डहाणूला.

जुलै २०१४ मुंबई 

रौप्यमहोत्सवी स्नेहसमेंलनाला काही खास नाव नव्हतं. पण एक वर्षानंतर झालेल्या समेंलनाचं जल्लोष असं बारसं झालं होतं. या जल्लोषच्या आयोजनात माझा खारीच्या वाट्यापेक्षाही छोटा वाटा होता! या जल्लोषचं स्वरूप जरा वेगळं होतं. बहुतेक मित्रांनी आपल्या कला सादर केल्या. गाण्याचे, समुह नृत्याचे आणि एकल नृत्याचे कार्यक्रम झाले. एकाने हिंदी चित्रपट सृष्टीतील कलाकारांच्या नकलांचा कार्यक्रम केला. याच मित्राने पुण्याजवळ वडगांवला एक घर विकत घेतलं त्याच सुमारास. पुढच्या महिन्यात तिकडे दोन दिवसांची सहल झाली.

जुलै २०१६ वसई 

जल्लोष हे सर्व तुकड्यांमधल्या मित्र मंडळींचं समेंलन होतं. त्या ऐवजी एका मित्राने पुढाकार घेऊन वसईला एके ठिकाणी एक सहल आयोजित केली. आपण ज्याला इव्हेंट मॅनेजमेन्ट म्हणतो तोच या मित्राचा व्यवसाय आहे! त्यामुळे सहलीचं ठिकाण आणि तिथली व्यवस्था उत्तमच असणार यात काही शंका नव्हती!

अशा खुप सहली आणि सणांच्या वेळच्या भेटीगाठींमधून ही बालमैत्री अधीकच घट्ट झाली आहे! शाळेत प्रवेश दसऱ्याला झाला म्हणून असेल कदाचित, पण दर वर्षी दसऱ्याच्या दिवशी शाळेत जाणे, दहावीच्या वर्गात जाऊन थोडा वेळ काढणे हा एक वार्षिक नित्यक्रम झाला आहे. शाळेप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याची ही एक संधी आहे! माझ्यासाठी हे चौथं वर्षं आहे. दिवाळीच्या आधीही एकत्र भेटण्याची प्रथा आहे. गेल्या वर्षी या दिवाळी भेटीगाठी मी आयोजित केल्या होत्या आणि त्याला प्रतिसादही उत्तम मिळाला होता. 

ही मैत्री आता खुप दृढ झाली आहे. किंबहुना या सगळ्यांबरोबर नुसती मैत्री न रहाता सगळे एकमेकांचे "मैत्र जीवाचे" झाले आहेत. एकमेकांच्या सुख दु:खाच्या प्रसंगी ही दृढता, ही मैत्रीची घट्ट विण प्रकर्षाने दिसून आली आहे. आणि मला खात्री आहे की ही मैत्री अशीच कायम राहील. आता मैत्री आहे म्हणजे मनमुटाव, रुसवे, अबोला किंवा लहानपणीच्या भाषेत सांगायचं तर कट्टी करणं हे ही आलंच ओघानं! तेव्हा, "कट्टी तर कट्टी, बारं बट्टी बारा महीने बोलू नकोस, लिंबाचा पाला तोडू नकोस!" असं जरी सांगितलं असलं तरी "एक वर्षानंतर परत न विसरता बोलायला ये!" हा संदेशही असे त्यात. पण सुदैवाने असा अबोला धरायची वेळ गेल्या चार वर्षात आली नाहीये. आणि या पुढेही अशी वेळ न येवो ही सदिच्छा व्यक्त करून हा लेखनाचा उद्योग आता पुरता थांबवतो!

दिवस दोनशेचारावा पान दोनशेचारावे!

२३/०७/२०१७ 
मुलुंड, मुंबई 

Tuesday 14 November 2017

रुद्रम - एक सुडाचा प्रवास


दूरचित्रवाणी वरील दैनंदिन मालिका हा प्रकार सुरू झाल्यापासून गेल्या पंचवीस एक वर्षांत रोज रात्री साडेनऊ वाजण्याची वाट पहायला लावणारी आणि 'शनिवार रविवारची सुट्टी जास्तच लांबतीय' असं वाटायला लावून सोमवारची वाट पाहायला लावणारी इतकी उत्कंठावर्धक मालिका कधी बनेल असं वाटलं नव्हतं! दुर्दैवाने दूरचित्रवाणी मालिका या सासू-सून, प्रेमाचा त्रिकोण/चौकोन/पंचकोन, अजून कुठला कोन आणि कुटुंबातील सदस्यांची एकमेकांवर कुरघोडी करण्याची अविरत कारस्थानं या बाहेर फार क्वचित पडल्या! श्वेतांबरा, एक शून्य शुन्य सारखे काही सन्माननीय अपवाद आहेत अर्थात, आणि ते त्या त्या काळात भरपूर गाजले.

काही मालिका या भावनाप्रधान असतात तर अन्य काही रहस्यमय असतात. आणि काही मालिका रुद्रम असतात! एकाच वेळेस भावनाप्रधानही आणि रहस्यमयही!! असा प्रकार दुर्मिळच आहे. झी युवा वाहिनीवरची रुद्रम ही मालिका सध्या बरीच गाजतेय, लोकप्रिय झालीय ती तिच्या याच वेगळेपणामुळे. मजबूत पटकथा, बऱ्यापैकी निर्दोष दिग्दर्शन, उत्तम चित्रीकरण, दर्जेदार लेखन आणि सर्व अभिनेत्यांचा काळजाला थेट भिडणारा अभिनय अशा सर्वच जमेच्या बाजू असताना रुद्रम लोकप्रिय झाली नसती तरच नवल होतं!

आनंद अलकुंटे यांनी इन्स्पेक्टर धुरत इतक्या ताकदीने उभा केलाय की त्यांच्या जागी अन्य कोणाची कल्पनाच करता येत नाही. स्वतःच्या मेहुण्यांच्या हत्येचे गूढ उलगडताना इन्स्पेक्टर धुरत यांनी हे नातं कधीच आणि कुठेही मध्ये येऊ दिले नाही आणि भर पत्रकार परिषदेत त्यांच्यावर नेमका हाच आरोप होतानाही आपला तोल कुठेही ढळू दिला नाही. या पत्रकार परिषदेच्या प्रसंगातला त्यांचा अभिनय लाजवाब होता. म्हणूनच रागिणी देसाई या प्रमुख पात्राची ही कथा असूनही इन्स्पेक्टर धुरत या पात्राचा प्रथम उल्लेख करावासा वाटला.

डॉक्टर मोहन आगाशे स्वतः प्रत्यक्षात मानसोपचार तज्ञ आहेत आणि त्यांची रुद्रममध्ये मानसोपचार तज्ञाचीच भूमिका आहे जी ते जगलेत असं म्हणणं वावगं ठरू नये. त्यांचा उल्लेख नाही झाला तर या मालिकेबद्दलचा कोणाताही लेख अपूर्णच राहील! संपूर्णपणे व्यावसायिक मानसोपचार तज्ञ साकारला आहे त्यांनी, जो रागिणीच्या आयुष्यात डोकावतो तर आहे पण गुंतत नाहीये. रागिणी ज्या परिस्थितीतून गेलीय आणि जातेय त्या परिस्थितीचे योग्य विश्लेषण करून, तिला अचूक प्रश्न विचारून तिच्याकडून खरी उत्तरं मिळवत आहेत आणि तिला तिच्या मानसिक अवस्थेतून बाहेर काढायचा प्रामाणिक प्रयत्न करताना दिसतात. त्यांच्यासारख्या दिग्गज अभिनेत्याबद्दल बोलावे तेवढे कमीच आहे!

सर्व पात्रे आणि कलाकार यांची गुंफण इतकी मस्त झालीय की अन्य कोणी अभिनेता अथवा अभिनेत्री त्या भूमिकेत पाहण्याची कल्पनाच करता येत नाही. मुक्ता बर्वे यांना एका लग्नाची दुसरी गोष्ट या मालिकेनंतर इतक्या वर्षांनी दूरचित्रवाणीवर पुन्हा पाहून अतिशय आनंद झाला! त्या एक उत्तम अभिनेत्री आहेत यात शंकाच नाही. अन्यायग्रस्त स्त्रीची व्यक्तिरेखा फार छान उभी केलीय त्यांनी. आई, वडील, नवरा, मुलगा आणि स्वतः रागिणी या छानशा पंचकोनी कुटुंबातले तीन कोन एका घडवून आणलेल्या अपघातात तोडले जातात आणि सुरू होतो एक सूडाचा प्रवास. हाच प्रवास आपल्याला सोमवार ते शुक्रवार रात्री साडेनऊ वाजता झी युवा वाहिनीसमोर खिळवून ठेवतोय! 

हा प्रवास सुरू करतानाच रागिणीला बहुतेक अंदाज आला असावा की याचा शेवट काय असेल म्हणूनच सुरुवातीपासूनच तिने स्वतःच्या सर्व हालचाली, सर्व कृत्ये यांचे स्वगत स्वरूपात चित्रीकरण करून ठेवले असावे आणि याच चित्रीकरणाचा वापर "फ्लॅशबॅक" सारखा करून प्रेक्षकांना रागिणीची पार्श्वभूमी, तिचा भूतकाळ सांगण्याची कल्पना भन्नाट होती. त्याच बरोबर हा "फ्लॅशबॅक" मर्यादित काळाचा ठेवला हीसुद्धा एक जमेची बाजू आहे. मालिका पाहायला सुरुवात केल्यावर अनेकांना अंदाज आला असेल की हा "फ्लॅशबॅक" मर्यादित भागांचा असेल, पूर्ण मालिका "फ्लॅशबॅक"मध्ये नसेल. अभय सातव त्याचं उपाहारगृह बंद करून घरी जाण्याच्या तयारीत असताना त्याला एकटं गाठून त्याच्याच गाडीत त्याला रागिणी बेशुध्द करते आणि निर्जन स्थळी नेऊन त्याच्या हत्येचा प्रयत्न करते, अशा थरारक प्रसंगातून या मालिकेची सुरुवात होते आणि अनेक धक्के - बरेचसे अनपेक्षित आणि कधीतरी अपेक्षित - देत कथा पुढे सरकते. 

अशा रहस्य कथांमध्ये कोणतेही पात्र आणायचे म्हणून आणलेले नसते कारण अशा कथांना उपकथानकांची गरज नसते. आखीव रेखीव कथा आणि पटकथा याच अशा मालिकांच्या यशाचे गुपित असतात. मग आपल्यासारखे सामान्य प्रेक्षक कधी सुहासला रागिणीचा फक्त शेजारी न समजता त्याचे रागिणीबरोबर प्रेम संबंध जोडू पहातो तर कधी त्याच्या व्यसनाधीन बाबांवर शंका घेतो! आधी म्हणाल्याप्रमाणे अन्य प्रकारच्या दैनंदिन मालिकांच्या कथानकाबद्दलही हे असे अंदाज बांधले जाऊ शकतात आणि ते बरेचदा खरेही ठरतात. पण रुद्रमासारख्या भावनाप्रधान रहस्य मालिकांचे यश यात असते की आजचा भाग बघून बांधलेला अंदाज उद्याच्या भागात खोटा ठरू शकतो आणि प्रेक्षक चालू भागातल्या कथानकात जास्त गुंततात! 

मगाशी "बऱ्यापैकी निर्दोष दिग्दर्शन" असा उल्लेख अशासाठी केला कारण काही चुका राहून गेलेल्या दिसल्या. एक म्हणजे रागिणी जिथे ती काम करते त्या वाहिनीवर बातम्या देताना दिसते तेव्हा त्या First News वाहिनीचे मानचित्र अर्थात logo त्या प्रक्षेपणात दिसत नाही. दुसरं म्हणजे रागिणीची बंदूक "कमी बोंबाबोंब करणारी" म्हणजे सायलेन्सर लावलेली असते तरीही त्यातून गोळी झाडल्यावर मोठा आवाज येतो. या बारीकसारीक गोष्टींवरचं दिग्दर्शकाचं लक्ष मालिकेला "चांगली मालिका" याकडून "उत्तम मालिका" याकडे नेते. पण रुद्रमची शक्ती स्थळे अर्थात plus points इतके आहेत की या छोट्या चुकांकडे दुर्लक्ष करता येते आणि म्हणूनच ही मालिका उत्तम आहे. 

फेसबुकवर जेव्हा केव्हा मी या मालिकेबद्दल लिहिले तेव्हा "#रुद्रम", "#झीयुवा" असे hashtag वापरून लिहिले. नंतर एकदा "#रुद्रम" या hashtagवर click करून पाहिले तेव्हा "रुद्रम Fans" असा फेसबुक समूह असल्याचे लक्षात आले आणि लगेच त्याचा सदस्य झालो. कोणत्याही मालिकेच्या चहात्यांचा असा समूह असणं आणि त्याचे एक हजारावर सदस्य असणे ही म्हटलं तर नवलाची गोष्ट आहे! मला कधीही वाटलं नव्हतं की मी अशा कुठल्या दैनंदिन मालिकेला वाहिलेल्या फेसबुक समूहाचा सदस्य होईन. या समूहावर मालिकेबद्दल चर्चा झडत आहेत. गेला महिनाभर दररोज मीही त्यात भाग घेत आहे. या समूहाचे बरेचसे सदस्य एकमेकांना ओळखताही नसतील तरीही त्यांच्याशी साता जन्माची मैत्री असल्यासारखे सगळेजण या समुहावरच्या गप्पांमध्ये सहभागी होतायत! काही जणांचा एखादा भाग बघायचा राहात असेल तर कोणी त्या भागाचे सविस्तर वर्णन (स्वतःच्या विशेष टिप्पणीसह) करत आहेत तर कोणी दूरचित्रवाणी संचावर मालिका दिसत असताना त्याचे फेसबुकवर थेट प्रक्षेपण करत आहेत! या समूहात रुद्रममध्ये काम करणारे काही कलाकारही आहेत. मालिकेतल्या रहस्यांबद्दल सगळे सदस्य या समूहावर अंदाज बांधत असताना हे सर्व कलाकार त्याची गंमतही बघत असतील आणि आनंदही घेत असतील या गप्पांचा! 

आता मालिका शेवटाकडे आलीय. येत्या शुक्रवारी शेवटचा भाग प्रसारित होणार आहे. उत्कंठा तर शिगेला पोहोचली आहेच, बराचसा अंदाजही आला आहे शेवट काय असेल याचा. पण उत्कंठा तशीच ठेवून वेळेआधी रहस्यभेद ना होऊ देता मालिका संपवणं हे दिग्दर्शक आणि अन्य चमूचं कौशल्य असेल! मालिकेचे निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते आणि पडद्यामागचे सर्व कलाकार प्रेक्षकांचा अपेक्षाभंग होणार नाही याची काळजी घेतील आणि कथेतील सर्व गुन्हेगारांना कायद्याने शिक्षा झालेले दाखवतील अशी अपेक्षा करून हा लेखनाचा उद्योग आजच्या पुरता थांबवतो!

दिवस तीनशे अठरावा पान तीनशे अठरावे

मुलुंड मुंबई 
बालदिन
१४/११/२०१७

 

Tuesday 31 October 2017

मुंबई - मला भावली तशी


एक चतुर्थांश शतकापेक्षा जास्त काळ मुंबईच्या बाहेर घालवल्यानंतर मी नोकरीसाठी मुंबईत आलो, पुण्यात माझे सर्व कुटुंब सोडून. त्या वेळी काही लोक आनंदी होते, काही अस्वस्थ झाले आणि काही जण माझ्या या निर्णयाबद्दल आश्चर्यचकित झाले, परंतु ही एक वेगळी कथा आहे.......
 
तर तेव्हा मुंबईत आल्यावर मी काही सहकाऱ्यांसह गोरेगांव पूर्वेला रहायचो. दिवसभराचा कार्यक्रम एकाच होता, सकाळी कंपनीच्या बसने कार्यालयात जायचे आणि कंपनीच्या त्याच बसने संध्याकाळी परत यायचे. जिथे रहात असे त्याला "घर" म्हणावं असं तिथे काहीही नव्हतं! "बॅचलर अकोमोडेशन" मध्ये एका सदनिकेत भारताच्या चार वेगवेगळ्या भागांतून आलेले आम्ही चार जण राहात होतो. तिथे मध्ये माझ्या नावे एक खाट आणि एक कपाट त्या दोनच गोष्टी होत्या. अन्य कोणी आले तर त्यांची बसायचीही सोया नव्हती!

महिन्याचा दुसरा आणि चौथा शनिवार, व सगळे रविवार सुट्टी असे. आणि या दुसऱ्या व चौथ्या शुक्रवारी मी पुण्याला पळत असे. पहिल्या व तिसऱ्या रविवारी पुण्याला गेलो नाही तर मालाड पश्चिमेकडे इन-ऑर्बिट किंवा हायपरसीटी मध्ये खरेदी करण्यासाठी जात असे किंवा मुंबईच्या अन्य भागांमध्ये फिरत असे. लहानपणी जी मुंबई मी सोडून गेलो होतो तिच्याशी अशी परत ओळख होत होती......
 
होय, माझा जन्म दादरचा (तेच सर्व एरियाचं फादर असलेलं दादर!) आणि म्हणून म्हणत असे, "मी मुंबईत माझ्या वयाच्या शून्य ते आठ वर्षे राहात होतो."
 
लोकल ट्रेन ही त्या काळीही लाईफ लाईनच होती मुंबईची! तेव्हा लोकलमध्ये ९ डबे असत, आजच्यासारखे १२ नाही. आणि १५ डबा लोकल भविष्यात येईल असे कोणालाही वाटले नसेल तेव्हा! लोकलच्या डब्यात सकाळच्या आणि संध्याकाळच्या गर्दीच्या वेळीही बऱ्यापैकी जागा असे. लोकल गाडी वळणावर असेल तेव्हा गाडीचा वळणावरचा अंतर्गोल दिसणारा भाग बघायला मला आवडत असे. त्यासाठी मी गाडी ज्या बाजूला वळेल त्या बाजूच्या खिडकीत धावत जात असे. पण आज गाडीतल्या गर्दीमुळे एका बाजू कडून दुसऱ्या बाजूकडे जाण्याचा असा विचारच फक्त मनात येऊ शकतो. मग ठाण्याहून ट्रान्स हार्बर रेल्वेने जाताना उजव्या खिडकीतली जागा पकडून ऐरोलीच्या दिशेच्या वळणावर मागचे पुढचे डबे बघायला मिळतात त्यावर समाधान मानावे लागते!   







ठाण्याहून ऐरोलीला वळणारी लोकल


मुंबईतील विहार तलाव, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, हँगिंग गार्डन, राणीचा बाग आणि अर्थातच गेटवे ऑफ इंडिया या ठिकाणी मी भेट दिली होती. माझ्या विहार तलाव आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या भेटींबद्दल मला फारच अस्पष्ट आठवणी आहेत परंतु हँगिंग गार्डन मधील म्हातारीच्या बुटातल्या जिन्याने वर गेल्यावर बाबांनी खालून माझे प्रकाशचित्र घेतल्याची आठवण आहे. 



ट्रेलर प्रकारची बस
बेस्टची ट्रेलर प्रकारची बस माझी आवडती होती. दुर्दैवाने काही अपघातांमुळे ती सेवेतून काढून टाकली गेली. या प्रकारच्या बसच्या वरच्या मजल्यावर सगळ्यात पुढच्या आसनावर बसून समोरची खिडकी उघडी ठेवून चेहऱ्यावर जोराचा वारा घेत प्रवास करणे हा एक भन्नाट अनुभव होता आणि आहे!  तिथून ९ १० फूट खालचा रस्ता आणि रस्त्यावरच्या अन्य गाड्यांचे टप पाहणे हा अनुभव वर्णन नाही करता येणार!! या ट्रेलर बसला चालकाचे वेगळे केबीन असते आणि प्रवाशी बसण्याचा दुमजली कक्ष त्याला एका मजबूत सांध्याने जोडलेला असतो. बस वळताना आधी हे केबीन वळते आणि नंतर प्रवासी बसण्याचा कक्ष वळतो. वरच्या मजल्यावरच्या सगळ्यात पुढच्या आसनावर बसून ही केबीन दिसते. मी कल्पना करत असे की त्या चालकाच्या जागी मी आहे वरच्या खिडकीतून मी स्वतःलाच बघतोय!! कुलाबा ते माहीम असा "क्रंमांक एक"चा बस मार्ग होता तेव्हा. तो कधी कधी कुलाबा ते शिवाजी उद्यान किंवा रा ग गडकरी चौक इथपर्यंत संपत असे. दिशा बदलून पुन्हा कुलाब्याला जाण्यासाठी ती बस गोखले रस्त्यावरून रानडे रस्त्यावर वळत असे आणि सेनापती बापटांच्या पुतळ्याला वळसा घालून ब्राम्हण सहाय्यक संघावरून पुन्हा गोखले रस्त्यावर येत असे. बाबांबरोबर कधीतरी हा छोटासा फेरफटका केल्याचंही आठवतंय!

मुंबईतल्या काही मोजक्या किल्ल्यांपैकी शीवचा किल्ला हेही एक प्रेक्षणीय स्थळ आहे. आताच्यासारखी गर्दी नसे तेव्हा तिथे. दिवसभर शांतपणे फिरता येत असे. लहानपणी एकदाच गेलो होतो तिथे. 

या आणि अशा बऱ्याच लहानपणीच्या आठवणी, थोड्या बरोबर घेऊन, थोड्या मागे ठेवून आम्ही मुंबई सोडली. पण काही ना काही कारणांनी मुंबईला येणं चालूच होतं. असंच एकदा एका कार्यक्रमासाठी मुंबईत आलेलं असताना मित्रांबरोबर गिरगांव चौपाटीवर उभं राहून भरतीच्या लाटा अंगावर घेत अख्खी दुपार काढली होती. मग चर्चगेटला एका हॉटेलमध्ये मस्तपैकी जेवून टॅक्सीने दादरला आलो होतो. "जीवाची मुंबई करणे" बहुतेक यालाच म्हणतात!

असं मुंबईला येणं जाणं चालूच होतं, पण आता दीर्घ कालावधीसाठी परत मुंबईत येण्याचा योग होता बहुतेक. "पायाभूत सुविधा" अर्थात infrastructure project या प्रकारात मोडणाऱ्या एका मोठ्या बांधकाम प्रकल्पाचा भाग होण्यासाठी मी पुणे सोडून परत मुंबईत आलो आणि लहानपणीच्या आठवणींना उजाळा देण्याची संधी चालून आली! कालांतराने कुटुंबाचेही स्थलांतर मुंबईत झाले आणि पुन्हा या सर्व ठिकाणांना भेटी देणे चालू झाले. 



म्हातारीचा बूट - २०११ मधील प्रकाशचित्र

महाराष्ट्राची राजकीय आणि भारताची आर्थिक राजधानी असलेली मुंबई अनेकांना सामावून घेते आणि उपजीविकेचे साधन पुरविते. भारताचं सर्व प्रकारे प्रातिनिधीत्व करते. गेल्या काही वर्षांत लोकल गाड्यांमध्ये, बसमध्ये गर्दी वाढली आहे, रस्त्यावर रहदारी वाढली आहे. या गर्दीला सामावून घेण्यासाठी , मध्य आणि पश्चिम रेल्वेवर बाहेरगावीच्या गाड्यांसाठी जास्तीच्या मार्गिका उभरून लोकल गाड्यांची वाहतुक अबाधित ठेवणे, मोनो व मेट्रो रेल्वे, विमानतळाची क्षमता वाढवणे, संपूर्ण नवा विमानतळ बांधणे असे व या सारखे अन्य महत्वाकांक्षी प्रकल्प राबवले गेले आहेत आणि राबवले जात आहेत. यातून भरपूर रोजगार निर्मिती झाली आहे, भैष्यातही होईल. मग याच रोजगाराच्या आशेने उज्ज्वल भविष्याच्या अपेक्षा ठेवून भारताच्या कानाकोपऱ्यातून आलेले लोक इथलेच होऊन जातात, मुंबईच त्यांची कर्मभूमी होते. हीच मुंबई गरज पडली तर आपलं स्पिरिट, आपला आत्माही दाखवते. पण इच्छा हीच राहील की  आत्मा दाखवण्याची अशी वेळ पुन्हा येऊ नये!

मुंबईत आल्यावर माझ्या व्यावसायाशी संबधीत ज्ञानात आणि अनुभवात अफाट वाढ झाली आणि त्याचबरोबर माझं सामाजिक आयुष्य अर्थात social circle सुद्धा खूप वाढले. सामाजिक कार्यामध्ये सहभाग घेणे सुरू झाले. दादरला ज्या शाळेत होतो लहानपणी त्या मित्र मैत्रिणींशी पुन्हा ओळख झाली, प्रकाशचित्रण कलेशी मैत्री झाली आणि वाढली. हा लेखनाचा उद्योग सुरू केला आणि बऱ्यापैकी लोकप्रियही झाला. म्हणूनच मला या गोष्टीचा आनंद आणि अभिमानही वाटतो की मुंबई माझी जन्मभूमी आणि कर्मभूमीही आहे!

उद्या, ०१/११/२०१७ रोजी मुंबईत परत येऊन एक दशक होईल. यानिमित्ताने माझं व्यावसायिक आणि सामाजिक आयुष्य असेच वृद्धिंगत होत राहील अशी आशा आणि अपेक्षा ठेवून आजच्या पुरता हा लेखनाचा उद्योग थांबवतो. 

दिवस तीनशे चारवा पण तीनशे चारावे 

मुलुंड मुंबई 
३१/१०/२०१७