Tuesday 16 January 2018

'लेखनाचा उद्योग'ची वर्षपूर्ती

साधारण एक वर्षांपूर्वी फुगेवाल्याच्या किस्सा समाज माध्यमांवर लिहून झाल्यावर लेखनाच्या या उद्योगाची, अर्थात ब्लॉगिंगची सुरवात झाली. या लेखन प्रवासात अडचणी अशा फार आल्याच नाहीत. आता, मनाला भावलेलं किंवा खुपलेलं लिहायचं, त्यात काय अडचणी येणार? इंटरनेट उपलब्ध नसणे किंवा फारफार तर फोनची बॅटरी संपणे! हो, मैत्र जीवाचे: पाच वर्षे, तेहेतीस वर्षे, चार वर्षे ही अख्खी ब्लॉगपोस्ट ब्लॉगरच्या  मोबाईल ॲपवरच लिहिली होती. 

दरम्यानच्या काळात ब्लॉग आणि ब्लॉगपोस्ट या दोन्हीमधला फरक कळला. म्हणजे लेखनाचा उद्योग हा ब्लॉग आणि वाचनाचा उद्योग ही ब्लॉगपोस्ट! वेगळ्या शब्दांत सांगायचं तर एखाद्या ब्लॉगमध्ये कदाचित एकाच विषयाला धरून वेगवेगळ्या ब्लॉगपोस्ट्स लिहायच्या आणि वेगळा विषय असेल तर वेगळा ब्लॉग लिहायचा हे लक्षात आलं. मग प्रवास वर्णनं लिहिण्यासाठी ट्रॅव्हल डायरीज् लिहायला सुरुवात केली आणि फोटोग्राफीबद्दल लिहिण्यासाठी, फोटो स्टोरीज लिहिण्यासाठी प्रकाशचित्रणाचा उद्योग हा वेगळा ब्लॉग तयार केला. गेल्या वर्षी एक भन्नाट दूरचित्रवाणी मालिका लोकप्रिय झाली, तिच्या बद्दल लिहिलेली ब्लॉगपोस्ट सर्वाधिक वाचली गेलेली पोस्ट आहे. स्वतःच्या जन्म शहराबद्दल कोणालाही आकर्षण आणि प्रेम असू शकते तसे मुंबईबद्दल मलाही आहे. म्हणूनच मुंबईबद्दलच्या माझ्या भावना ज्या जवळ जवळ दहा वर्षांपूर्वी इंग्रजीत लिहायला घेतल्या होत्या त्याही ब्लॉगपोस्ट स्वरूपात व्यक्त केल्या आहेत, त्याचबरोबर मुंबईचे स्पिरिट याबद्दल जे टोचते तेही शब्दबद्ध करून झालेय.

अशाप्रकारे गेल्या वर्षभरात या लेखनाच्या उद्योगाने बर्यापैकी बाळसे धरले आहे. प्रत्येक ब्लॉगपोस्टचा शेवट करायची कल्पना कशी सुचली हे कथा लेखन या ब्लॉगपोस्टमध्ये लिहिले आहे. म्हणून ३१/१२/२०१७ रोजी एक आणि ०१/०१/२०१८ रोजी एक असे दोन दिवस सलग ब्लॉगपोस्ट्स प्रसिद्ध केल्या. त्यामुळे रोज एक ब्लॉगपोस्ट लिहिण्याचा माझा विचार आहे का असे अनेकांना वाटले असावे, पण तसा काही सध्या तरी मानस नाही. तरीही वर्षभरात बारा म्हणजे महिन्याला सरासरी एक ब्लॉगपोस्ट लिहिली आहे 'लेखनाचा उद्योग' मध्ये. ट्रॅव्हल डायरीज् मधल्या सहा आणि प्रकाशचित्रणाचा उद्योग मधल्या दोन धरल्या तर वर्षभरात २० ब्लॉगपोस्ट लिहून झाल्यात. एखाद्या नवख्या हौशी लेखकासाठी हे प्रमाण कसे आहे यावर जाणकारांनी टिप्पण्णी करावी. 

तर ब्लॉगरच्या मोबाईल ॲप मुळे कुठेही आणि कधीही ब्लॉगपोस्ट लिहिणे आणि संपादित करणे शक्य झाले. पण या ॲपमध्ये कोणती ब्लॉगपोस्ट कितीवेळा वाचली गेली ते कळत नाही, जे वेबसाईटवर कळते. तसेच याचे अपडेट्स प्ले स्टोअरवर उपलब्ध नाहीत. तसंच या ॲपवर अक्षराचा (फॉन्टचा) आकार कमी जास्त करता न येणे हीसुद्धा या ॲपची मर्यादा आहे. त्या मुळे यावर ब्लॉग लिहिणे तसे जिकिरीचे आहे. तरीही आयत्या वेळेच्या बदलांसाठी हे ॲप उपयुक्त आहे असेच म्हणता येईल. 

अशा प्रकारे  संगणक आणि भ्रमण ध्वनी (अर्थात mobile phone) या दोन्ही साधनांचा वापर करून ब्लॉगिंग चालू आहे. ते असेच चालू राहो, वेगवेगळे विषय सुचत राहून चांगले लेखन हातून घडो हीच प्रार्थना करून हा लेखनाचा उद्योग आजच्या पुरता थांबवतो. 

दिवस सोळावा पान सोळावे. 

सिंहगड रस्ता, पुणे 
१६/०१/२०१८ 

Monday 1 January 2018

स्वागतम २०१८

नवी पहाट, नवी सकाळ, नवे वर्ष, नवे स्वप्न!

भल्याबुऱ्या आठवणींचं गाठोडं घेऊन २०१७ भूतकाळात गेलंय आणि अनंत संधी घेऊन २०१८ वर्तमानात आलंय. या संधी आहेत स्वतःबरोबरच समाजाच्या उन्नतीच्या, या संधी आहेत छोट्या छोट्या गोष्टींमधला आनंद शोधण्याबरोबरच मोठ्या उद्दिष्टांकडे वाटचाल चालू ठेवण्याच्या, या संधी आहेत सामाजिक भान जपण्याच्या आणि ते वृद्धिंगत करण्याच्या, या संधी आहेत गत वर्षात काही चुका झाल्या असतील तर त्या पुन्हा न करण्याचा संकल्प करण्याच्या. 

या आणि अशा अनेक संधी या वर्षरुपी पुस्तकाच्या प्रत्येक दिवसरूपी पानावर असतील, कधी त्या सहज सापडतील तर कधी त्या शोधण्यासाठी कदाचित थोडे कष्ट सोसावे लागतील. पण संधी सापडतील जरूर! दर वेळेस संधीचं सोनं होईलच असे नाही पण तसं करण्याचा प्रयत्न नक्कीच केला पाहिजे. यश मिळणं न मिळणं हे करत्या कारवित्याच्या हाती असतं. अशा प्रकारे वाटचाल करताना एक सोपा मंत्र ध्यानी ठेवला तर बऱ्याच गोष्टी सोप्या होतील:

आपण ज्या गोष्टी करतो, ज्या गोष्टींवर आपला ताबा असतो त्या गोष्टींवर श्रद्धा ठेवणे आणि ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत त्याबाबतीत सबुरी ठेवणे!

अशी श्रद्धा आणि त्या जोडीला परमेश्वरावर भक्ती असली की कार्यसिद्धीस येणाऱ्या अडथाळ्यांची तीव्रता कमी होते. या दोन्हीपैकी एकाही गोष्टीचा अभाव किंवा कमतरता असेल तर अपेक्षित परिणाम दिसत नाहीत किंवा उशीरा दिसतात, जेव्हा कदाचित वेळ निघून गेलेली असते. त्यामुळे अशी वेळ निघून जाण्याची वेळ गत वर्षात आली असल्यास त्यापासून धडा घेऊन अशी वेळ परत न येण्याचा आज नव वर्ष दिनीच संकल्प करूया. 

आपल्या रोजच्या व्यावसायिक जीवनात भरपूर व्याप असतात, ताण तणाव असतात. ते कमी करण्यासाठी आपल्या कचेरीत stress management ची शिबिरे होत असतील त्याला जाण्याबरोबरच काही सोप्या युक्त्या करता येतील. घरात पाळीव प्राणी असणं हे असा ताण तणाव कमी करण्याचं उत्तम साधन आहे असं म्हणतात. पण कुत्रा मांजर पाळणं सगळ्यांनाच शक्य होतं असं नाही. मग आपल्या राहत्या घराच्या वसाहतीत (society/colony मध्ये) काही कुत्रे मांजरी असतील तर त्यांच्याशी फटकून वागण्यापेक्षा त्यांना कधीतरी खायला देणं हाही बदल चांगला आहे. तसंच कामाच्या ठिकाणी जाता येता आवडतं संगीत ऐकणे हाही ताण तणावातून मुक्त होण्याचा एक चांगला उपाय आहे बरं का! एखादा छंद जोपासताना तोच छंद असलेल्या पण जरा वेगळ्या स्तरावर त्याला जोपासणाऱ्या, पूर्णपणे अपरिचित लोकांशी संपर्क साधून त्यांच्याशी त्या विषयावर चर्चा करता येईल. समाज माध्यमांवर त्या त्या छंदाशी संबधीत समूह शोधून त्यांचा सदस्य होणे, आपले काम सादर करणे, इतरांचे काम पाहणे आणि या संवादातून, देवाणघेवाणीतून त्या विषयातलं आपलं ज्ञान वाढवणं हा एक आनंददायी प्रकार आहे. 

या आणि अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून आपल्याला अफाट आनंद मिळून ताण तणाव कमी होण्यास मदत होऊ शकते. अर्थात हे मला सुचलेले, पटलेले आणि उमगलेले काही मार्ग आहेत आनंदी राहण्याचे. प्रत्येकाला आपापले मार्ग स्वतःच शोधून त्यावर वाटचाल करायची आहे. आणि मी काही तत्वज्ञ नाही कोणाला मार्गदर्शन करायला. या सगळ्या अनुभलेल्या गोष्टी इथे मांडत आहे, एवढंच!

काल ३६५ पानांचं एक पुस्तक मिटून आज ३६५ पानांचंच अजून एक कोरं पुस्तक उघडलंय. त्याच्या प्रत्येक पानावर काही ना काही चांगलं लिहिण्याचा उद्योग या वर्षीही चालू ठेवणार आहे. भेटू लवकरच पुढच्या एखाद्या पानावर!

दिवस पहिला पान पहिले!

मुलुंड मुंबई 
०१/०१/२०१८