Friday 13 September 2019

The day I was born for!

This blog, lekhanacha udyog, is my platform, my medium to express to the world, the things that I like and the things that bother me, and the articles herein are generally in my mother tongue Marathi. But this post is in English because I want it to reach up to some people I know, who are from different parts of the world and probably do not understand Marathi. So let's begin........

Inauguration of  Plumbing lab by Bosch India Foundation at ITI Chinchwad 
Honourable Minister, Skill Development, Home, Law and Justice, Government of Maharashtra, Dr. Ranjit Patil (wearing blue jacket) and me (the only guy wearing a half sleeve shirt) inaugurating the plumbing laboratory at ITI Chinchwad for Bosch India Foundation.

It is said that a picture is worth a thousand words. But here I may have to put up more than a thousand words to let you all know the significance of this picture. What is this picture about? To have an answer to this question, we will have to do some time travel. Hop in this verbose time machine and fasten your seat belts! 

This all started about an year and half ago, January 2018, to be precise when I underwent a training of being a trainer, which was conducted as per the guidelines of Indian Plumbing Skills Sector Council (IPSSC) under Pradhan Mantri Kaushal Vikas Yojana (PMKVY), in the field of my profession i.e. plumbing engineering and design. The trainers who delivered that training are an institute from Pune known as Dnyanda Institute of Flow Piping Technology (DIFPT). During that training I felt like I need to connect with these people. And I am proud to say that today, I am part of the institute!

Let's rewind again to an year ago, to August 2018, when I was informed by the directors of DIFPT that Bosch India Foundation is coming up with what they call as Plumbing Artisan Center in or around Pune under the CSR activities of Bosch as a company. An artisan is a trained and skilled worker in any field where skilled workforce is required for doing the said task flawlessly. 

Things started unveiling to me as Bosch was looking for suitable space for the proposed Plumbing Artisan Center and I was getting a feel that I am going to be part of something really big. Well, it was not the first time that I was getting associated with such big projects but this time things were little different and were at levels I had never worked at. I was going to play an important role in the making of this center. This much was good enough for me to understand my responsibility and to gear up for the things to come.

During this time, there were site visits going on to some of the short listed locations for the center and in one such visit at Chakan, close to the factory of Bosch (my first site visit for this center) I met a very senior person from Bosch. I was introduced to him by the one of the director of DIFPT and that too, was an immediate connect!

Any plumbing artisan center is required to have the components like a classroom with a projector for presentations and visually aided training, a place for work stations for trainee plumbers to practice various operations and activities required to do plumbing work, a tool room, practical area and a plumbing laboratory. Wait! What? A plumbing laboratory? I had my eyebrows and ears stretched and it flashed upon me that this is one such type of project that I have not designed! Because that was the time till when I was mentioning in my career profile, that I have worked as plumbing design consultant for all types of building construction projects. Then started the discussions about the interior layout of the proposed center. Many layouts were prepared and rejected for this place at Chakan. 

All such big projects have to overcome small hurdles and this project was no different. For some reason, it was not possible for us (Bosch India Foundation, DIFPT and all the partner companies) to erect and commission the center at this place in Chakan. Again it was hunt for place and Bosch got this place at the Industrial Training Institute (ITI) in Chinchwad near Pune.

The available of space at ITI is little different than what we had visited at Chakan. Hence any of the layout prepared for the place at Chakan was not suitable for this place at ITI Chinchwad. As such all the drawing boards (CAD files, actually) were required to be cleared and a fresh start was required, At Chakan it was possible to have the training area and the lab literally under one roof. But at ITI we had to separate these two under the two roofs i.e. two different sheds made available in the premises of the ITI. As a starting point for the design, I received the drawing showing the plans and elevations of the place where the lab was proposed and it was my responsibility to fit the lab in the given space. I am a Civil Engineer and not an Architect. Hence it was not that easy for me to make an architectural layout. So I had to burn some mid night oil to reach to the interior layout of the lab. 

Supreme, the company manufacturing all types of plastic pipes and related accessories required for building plumbing works is a partner company in this center and they have their own lab set up in their factory premises at Jalgaon. Jaquar, the company manufacturing all the taps, faucets and sanitary fixtures like basins and water closets is another partner company in this center. They also have a lab set up at ITI Panhala near Kolhapur. Visits to these places were must before starting any work on the lab for Bosch. Also I had visited the plumbing lab at College of Engineering, Pune during the training of becoming a trainer, which I mentioned earlier. Whatever I had seen, witnessed and assimilated at these three places and the pictures I could click there, was my working capital for starting the plumbing design of the lab for Bosch. I am happy that I could improvise up on what I had seen at these places.

Now the layout of different modules in the lab was done and was approved by Bosch. To prepare the plumbing layout for this lab was easy yet challenging. Easy because I carry an experience of a quarter century in this field of plumbing design, and challenging because anything and everything in this lab was required to have academic value. This lab consists of four different modules of installations viz. toilets for residential or hotel accommodation, for divyang or differently able people and for a commercial building. The forth module consists of special fixtures like a scrub sink and a bed pan cleaning sink required in a hospital. The main highlight of this lab is a sanitary down take plumbing system as per National Building Code of India and it is made using transparent pipes specially manufactured and provided by Supreme.


Explaining the sanitary down take system to Dr. Patil
This lab is a must visit for anyone who is interested in making career in plumbing as a domain, plumbers to plumbing engineers alike.



Functioning of this lab requires assured supply of water, which can be recycled and reused. This is because none of the toilet modules are supposed to be actually used as they are for academic purpose. This requires pumping water into the various modules of the lab and Grundfos, a well known company manufacturing all different types of pumps supplied the required hydro pneumatic pumping system for this lab.

Hydro Pneumatic Pumping System by Grundfos
On the day of inauguration i.e. on 29th August 2019, my role was to explain to Dr. Patil, all the different parts of the lab and their academic significance. Hence I was standing next the HR Chief of Bosch India who was escorting Dr. Patil. This HR Chief knew my contribution in making of this lab and hence offered me that I also shall cut the ribbon along with Dr. Patil! Oh!! I never had thought that something like this will happen in my life. I can not even say that it was a dream come true because I had never dreamed in my entire life that I could be opening something like this plumbing lab standing next to such high profile people. 

Plumbing design became my profession right after my graduation as my father is from the same business. DIFPT started giving skill training for aspiring plumbers some nine years ago. I think it was destined that I will be part of DIFPT and get a chance to be part of such a magnanimous entity and get recognised at entirely different levels than my professional life so far. That's why I said this was the day I was born for!!

Nice rapport was built with project engineer from Bosch and with his buddy, the chief trainer at the center, during designing, erecting, testing and commissioning this lab. Conducting the final test run at the midnight before the inauguration and dinner thereafter with the this project engineer, chief trainer and the contractor cannot be forgotten! I feel that, though it was the end of the project of erecting this lab, it is entirely new beginning as many more such plumbing artisan centers are yet to come and a few of them are by Bosch itself.

DIFPT Team with Bosch Team
A simple thank you to office bearers at DIFPT and Bosch can not justify what I have learned during making of this center. In reality, there are no known words that can express my gratitude to them. However I cannot walk away just like that. I have to thank everyone who is associated with this plumbing artisan center and helped me enrich my experience in any possible way!!

I now stop being verbose hoping to get many more such opportunities in near future.

Two hundred and fifty sixth day.
Two hundred and fifty sixth page.

-Chetan Arvind Apte
13/09/2019
Sinhgadh Road, Pune.















Monday 14 January 2019

संजय उवाच

सन २००४ ते सन २०१४ या काळात भारतीय राजकारणात काय काय झालं आणि देशभरात त्याचे काय काय आणि कसे कसे पडसाद उमटले ते सर्व भारतीयांनी अनुभवलं आहे, आणि सर्व १२५ कोटी जनतेची त्याच्याबद्दल आपापली मते असतील. ती मते बरोबर आहेत का चुक, भारतीय माध्यमांनी म्हणजे दूरचित्रवाणीवरील वृत्त वाहिन्या आणि वृत्तपत्रे यांनी त्या सर्व घटनांचे त्या त्या वेळी विश्लेषण कसे केले होते, त्या विश्लेषणात किती तथ्य होते याचा उहापोह करणे हा उद्देश ठेवून हा लेखनाचा उद्योग करत नाहीये. तर निमित्त आहे दिनांक ११/०१/२०१९ रोजी प्रदर्शित झालेला संजय बारू लिखित याच नावाच्या पुस्तकावर आधारित चित्रपट द ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर.  

इथे एक गोष्ट मी नमूद करू इच्छितो की मी हे पुस्तक किंवा त्याचा (उपलब्ध असल्यास) कोणताही अनुवाद वाचलेला नाही आणि इथे लिहिलेल्या सर्व गोष्टी या चित्रपटाबद्दलच आहेत.

अपेक्षेप्रमाणे चित्रपट सुरू होतो तो २००४ साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांचा निकाल आणि डॉक्टर मनमोहन सिंग यांची पंतप्रधानपदी निवड होणे या घटनांपासून. मंत्रिमंडळ निवडीच्या वेळी घडलेल्या काही सूचक घटना या दृष्यांमधे आहेत ज्या कदाचित सामान्य भारतीय जनतेला माहीत नाहीत. शपथविधी समारंभानंतरच्या मेजवानीच्या वेळेस त्या सभागृहात बॉडी हार्नेसवर बांधलेला कॅमेरा फिरत ही सगळी दृष्ये टिपत नवनिर्वाचित पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग, पक्षप्रमुख सोनिया गांधी आणि त्यांचा परिवार उभे आहेत, तिथे जात असताना एक व्यक्ती कॅमेरासमोर पाठमोरी येते आणि एका मेजापाशी उभी राहाते. पंतप्रधान त्या व्यक्तीला नजरेनेच थांब असे सांगतात. आणि थोड्या वेळाने ती व्यक्ती म्हणजेच पुस्तकाचे लेखक संजय बारू म्हणजेच अभिनेते अक्षय खन्ना, "सौ करोड की आबादीवाले इस देश को ये कुछ गिने चुने लोग चालते हैं। ये देश की कहानी लिखते हैं और मै, इनकी कहानी लेखता हूं!" असे म्हणत पडद्याच्या दोन मिती छेदून तिसऱ्या मितीत येतात आणि प्रेक्षकांबरोबर थेट संवाद साधतात! चित्रपट इथेच पकड घेतो आणि ती शेवटपर्यंत सुटत नाही. 

पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदा आपल्या कार्यालयाकडे डॉक्टर मनमोहन सिंग जात असताना त्यांनी २००४ साली पंतप्रधानपद स्वीकारेपर्यंत ज्या काही महत्वाच्या हुद्द्यांवर काम केले होते त्या त्या वेळच्या वेशभूषेमधले डॉक्टर मनमोहन सिंग हे पंत्रप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांना अभिवादन करतात असे दाखवले आहे. हा प्रसंग फार उत्तम चित्रित केला आहे आणि त्यांची त्या त्या वेळची वेषभूषासुद्धा अचूक केली आहे.

इथून पुढे प्रेक्षकांना पाहायला मिळते त्या दहा वर्षांत दिल्लीत प्रधानमंत्री कार्यालयात घडणाऱ्या प्रमुख घटना आणि त्या अनुषंगाने तत्कालीन पंतप्रधानांच्या वैयक्तिक आयुष्यात घडणाऱ्या प्रमुख घटना यांचा एक कोलाज! अभिनेते अनुपम खेर यांनी तत्कालीन पंतप्रधानांची भूमिका साकारण्यासाठी घेतलेली मेहनत चित्रपटभर दिसते. चालणे, बोलताना केले जाणारे हातवारे म्हणजेच बॉडी लँग्वेजवर अनुपम खेर यांनी विषे लक्ष दिले आहे. आणि आवाजात केलेला बदल तर ऐकताच राहावा! ते ही भूमिका जगले आहेत असे म्हणणे वावगे ठरू नये. संपूर्ण चित्रपट तत्कालीन पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग आणि त्यांचे तत्कालीन माध्यम सल्लागार संजय बारू यांच्याभोवतीच फिरतो. त्या दोघांमध्ये निर्माण झालेले भावबंधसुद्धा योग्य प्रकारे दाखवले आहेत आणि ते बघायलाच हवेत. संजय बारू यांना बोलावताना डॉक्टर मनमोहन सिंग "संजया" अशी हाक मारताना दाखवले आहे आणि ते मला खूप आवडले. त्यांची माध्यम सल्लागार म्हणून नियुक्ती करताना पंतप्रधान त्यांना म्हणतात, "संजया, महाभारतमे संजय धृतराष्ट्रकी आंख और कान बने थे. तुम मेरी आंख और कान बनो!" 

हा चित्रपटाचे कथानक खुद्द पंतप्रधान, त्यांचे स्वीय सचिव, माध्यम सल्लागार यांच्या भोवती आणि पी एम ओ म्हणजेच पंतप्रधान कार्यालय याठिकाणीच जास्त पुढे सरकते. त्यासाठी नेपथ्य उत्तमच असायला हवे होते आणि कला दिग्दर्शकांनी यात काहीही कमतरता ठेवली नाहीये. चित्रीकरणात ग्रीन स्क्रीन या प्रकाराचा मुबलक वापर केला आहे. पंतप्रधान कार्यालयाच्या बाहेर ज्या इमारती आहेत त्या आणि तिथे उभे असलेले सुरक्षा रक्षक हे कार्यालयाच्या खिडकीतून प्रेक्षकांना दिसत राहातात. चित्रपटाचे बरेचसे चित्रीकरण भारताबाहेर झाले असल्याने असे करणे आवश्यक होते, आणि म्हणूनच ते चतुर प्रेक्षकांच्या लक्षात येऊ शकते. 

तत्कालीन पक्षप्रमुख सोनिया गांधी यांच्या भूमिकेत जर्मन अभिनेत्री सुझान बर्नेट शोभून दिसतात. इथे परदेशीच अभिनेत्री हवी होती कारण कोणत्याही परदेशी मूळ असलेल्या व्यक्तीने हिंदी बोलणे आणि मुळच्या भारतीय व्यक्तीने परदेशी व्यक्तीसारखे अडखळत किंवा त्या प्रकारच्या अक्सेंटमध्ये हिंदी बोलणे यात बराच फरक आहे. आणि सुझान यांनी परदेशी व्यक्तीचा हा हिंदी बोलण्याचा विकनेस उत्तम प्रकारे स्ट्रेंथमध्ये बदलवला आहे! राहुल गांधी यांच्या भूमिकेत अर्जुन माथूर आणि प्रियांका गांधी यांच्या भूमिकेत आहना कुमारा यांची निवड सार्थ आहे. या भूमिका साकारण्यासाठी या दोघांना विशेष मेहनत घ्यायला लागली नसावी असे वाटते. या दोघांचे चित्रपटाच्या कथानकातले स्थान महत्त्वाचे आहेच पण त्यांच्या भूमिकेला फार लांबी नाहीये. बाकी सर्व कलाकार ज्या व्यक्तीरेखा साकारत आहेत त्यांच्या सारखे दिसणे ही एक मुख्य गरज लक्षात ठेवून त्या त्या कलाकारांची निवड केली आहे. म्हणूनच डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या पत्नी श्रीमती गुरशरन कौर यांच्या भूमिकेत दिव्या सेठ, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या भूमिकेत रमेश भाटकर, माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या भूमिकेत राम अवतार, लालकृष्ण अडवाणी यांच्या भूमिकेत अवतार सहानी आणि माजी पंतप्रधान दिवंगत पी व्ही नरसिंहा राव यांच्या भूमिकेत अजित सातभाई हे सर्व कलाकार शोभून दिसतात. तरीही या सपोर्टींग कास्टमध्ये सगळ्यात जास्त भाव खातात ते अहमद पटेल यांच्या भूमिकेत (तसे दिसत नसूनही) अभिनेते विपीन शर्मा! अक्षय खन्ना आणि त्यांचे काही निवडक प्रसंग उठावदार करण्यात या दोघांच्या अभिनयाबरोबरच ज्या ठिकाणी या प्रस्नागांचे चित्रीकरण झाले आहे तेथील परिसरही तितकाच कारणीभूत आहे आणि हे मोठ्या पडद्यावरच पाहायला हवे!





अक्षय खन्ना यांच्या अभिनयाबद्दल लिहिले नाही तर या चित्रपटाबद्दल कोणताच लेख पूर्ण होऊ शकत नाही. वर उल्लेख केल्याप्रमाणे "त्या त्या व्यक्तीसारखे दिसणे" हा एक मूळ निकष लावून कलाकारांची निवड झाली आहे. परंतु २०/०४/२०१४ रोजी संजय बारू लिखित द ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर हे पुस्तक प्रकाशित होईपर्यंत संजय बारू हे कोण आहेत हे फार कमी भारतीयांना माहीत होते. त्यामुळे त्यांची भूमिका करणारा कलाकार त्यांच्यासारखाच दिसला पाहिजे अशी आवश्यकता दिग्दर्शकांना वाटली नसावी. म्हणूनच अक्षय खन्ना हे संजय बारू यांच्यासारखे आजिबात दिसत नसले तरीही ते वावगे वाटले नाहीये. त्यामुळे त्यांना त्यांचा सहज अभिनय करायला पूर्ण वाव होता आणि त्यांनी ही संधी योग्य साधली आहे असेच म्हणावे लागेल. म्हणूनच, "ये जीत आपकी जीत है, ये पी एम ओ आपका टर्फ है।" किंवा "ना ना ना ना। डॉक्टर सिंग मिन्स बिझनेस!" ही वाक्ये त्यांच्या कायिक आणि वाचिक अभिनयामुळेच लक्षात राहतात! संजय बारू यांच्या भूमिकेत अक्षय खन्ना हे सूत्रधारासारखे या चित्रपटात वावरतात आणि त्यांच्याच दृष्टीकोनातून सर्व घटना प्रेक्षकांना दिसतात म्हणून या लेखाला संजय उवाच हे नाव द्यावे असे मला वाटले. 

अपॆक्षेप्रमाणे चित्रपट संपतो तो २०१४ साली झालेल्या निवडणुकांमध्ये झालेल्या सत्ता बदलाने. . . . . . . . 

विजय रत्नाकर गुट्टे यांचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच चित्रपट आहे असे कुठेही वाटत नाही. कथानकावर असलेली त्यांची घट्ट पकड चित्रपट बघताना क्षणोक्षणी जाणवते. ज्याला लूज एंड्स म्हणता येईल अशी एकही गोष्ट चित्रपटात दिसत नाही आणि माझ्यामते हे दिग्दर्शकाचे यश आहे.

भारतीय राजकारणावर भाष्य करणारे आणि राजकारणी व्यक्तींवर आधारित पात्रयोजना असलेले अनेक चित्रपट या पूर्वी प्रकाशित झाले आहेत. त्या सर्वच चित्रपटांमधील पात्रे आणि त्यांचे कथानक काल्पनिक होते. कदाचित द ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर हा भारतीय राजकारणावरील पहिला चित्रपट असावा ज्यातील बहुतेक पात्रे म्हणजेच त्या व्यक्ती जिवंत आहेत आणि राजकारणात सक्रियसुद्धा आहेत. म्हणूनच पात्रांची आणि व्यक्तींची नावे आहेत तीच ठेवणे आवश्यक होते. शिवाय राजकारणाविषयी प्रगल्भ विचार असलेले भारतीय नागरिक हा बदल सहज स्वीकारतील अशी अशा ठेवायलाही भरपूर वाव आहे. भारतीय राजकारणावर आधारित असेच छान चित्रपट भविष्यातही बनतील आणि प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतील अशी अपेक्षा करून हा लेखनाचा उद्योग आजच्या पुरता थांबवतो. जय हिंद!

दिवस चौदावा पान चौदावे

१४/०१/२०१८
मुलुंड मुंबई









Friday 11 January 2019

"हाऊ इज द जोश?" "हाय सर!"


गेली अनेक दशके भारतीय हिंदी चित्रपटांमधले व्हिलन हे डाकू तरी असायचे किंवा कोणी तरी वाममार्गाने कमावलेल्या पैशाच्या जोरावर ताकदवान झालेली काल्पनिक व्यक्ती. पण गेल्या १५ २० वर्षांतल्या चित्रपटांकडे पाहिले तर आपले शेजारी देश आणि त्यातील काही दुष्ट प्रवृत्तीची माणसे ही मुख्य व्हिलनच्या स्वरूपात दिसायला लागली होती. तरीही या चित्रपटांची कथानके काल्पनिकच असायची. मी कोणत्या चित्रपटांबद्दल लिहीत आहे आहे चतुर वाचकांच्या लक्षात आले असेलच! शेजारी देशांबरोबर झालेल्या प्रत्यक्ष युद्धावरचे, भारतात झालेल्या दहशदवादी हल्ल्यांवरचे किंवा विमान अपहरणाचे कथानक असलेले आणि इतर बराच मसाला भरलेले भरपूर चित्रपट आले आणि गाजलेही. परंतु नजीकच्या भूतकाळातील लक्षात राहिलेला दुर्दैवी हल्ला होता उरी येथील भारतीय लष्कराच्या तळावर १८/०९/२०१६ रोजी झालेला हल्ला. भारतीय लष्कराच्याच गणवेषात आलेल्या फक्त चार सशस्त्र हल्लेखोरांनी १९ भारतीय सैनिकांना ठार केले होते आणि त्यामुळे संपूर्ण देशाची भावना एकाच होती, प्रतिशोध! या सत्य घटनांवर आधारित आहे दिनांक ११/०१/२०१९ रोजी प्रदर्शित झालेला चित्रपट उरी: द सर्जिकल स्ट्राईक. 

हा चित्रपट ज्या घटनांवर बेतलेला आहे, त्याच्या आधीच्या आणि नंतरच्या संबंधित घटना व घडामोडी सर्व भारतीयांना माहीत आहेत असे गृहीत धरून या चित्रपटाची कथा सांगण्यात आपणा वाचकांचा वेळ वाया न घालवता या चित्रपटाच्या सादरीकरणाबद्दल जास्त लिहीन म्हणतो. कारण आपण सर्व सुजाण वाचक उरी: द सर्जिकल स्ट्राईक हा चित्रपट आपल्या जवळच्या चित्रपट गृहात जाऊन पहालाच!

चित्रपट सुरू होतो तो ०४/०६/२०१५ रोजी मणिपूर राज्यातील चांदेल जिल्ह्यात भारतीय लष्कराच्या ताफ्यावर झालेल्या दहशदवादी हल्ल्याच्या घटनेने. बहुदा सर्वच युद्धपटांमध्ये, प्रवासात असताना सैनिक नेहमी आनंदात वीररसपूर्ण गाणी म्हणत जाताना दाखवले आहेत तसे या प्रसंगातही दाखवले आहे. त्या ताफ्यातल्या सगळ्यात पुढच्या बसचे टायर पंक्चर होते म्हणून चालक खाली उतरतो तेव्हा एखादा काटाकुटा घुसून टायर पंक्चर झाले नसावे, काहीतरी घातपात असावा हे त्या अभिनेत्याच्या चेहऱ्यावरचे भाव पाहूनच प्रेक्षकांना कळते कारण त्या अभिनेत्यावर रोखलेला कॅमेरा बसच्या पुढच्या चाकाकडे रोखला जातो आणि प्रेक्षकांना रस्त्यात मुद्दाम टाकलेले खिळे दिसतात! हे हल्लेखोर आपल्या पूर्वेकडील शेजारी देशामधून भारतात आल्याचे नंतर भारतीय लष्कराला कळले होते आणि भारताने "दुसऱ्या देशात जाऊन केलेली पहिली दहशदवाद विरोधी कारवाई" जी संपूर्ण भारताने नंतर बातम्यांमधून पाहिली आणि वाचली तीसुद्धा या चित्रपटात खूपच प्रभावीपणे दाखवलेली आहे. काही मोजक्या सैनिकांची एक तुकडी घेऊन मेजर विहान शेरगील (चित्रपटातील नाव) दहशदवाद्यांच्या या तळावर हल्ला करून सर्व दहशतवाद्यांना कंठस्नान घालून, त्यांची सर्व शस्त्रे आणि सामुग्री नष्ट करून, आणि विशेष म्हणजे एकही सैनिक न गमावता परत येतो आणि चांदेल हल्ल्याचा प्रतिशोध पूर्ण करतो असे दाखवले आहे.

या प्रतिशोधाचे यश साजरे करण्यासाठी आयोजित केलेल्या समारंभात मेजर विहान शेरगील, सर्व सैनिक, अधिकारी आणि आणि लष्कर प्रमुख उपस्थित असतात. राष्ट्रीय सुरक्षा सलागारांबरोबर (रा सु स) माननीय पंतप्रधान या समारंभात जात आहेत हे दृष्य या दोन कलाकारांच्या मागे मागे कॅमेरा ठेवून चित्रित केले आहे. उजवीकडे रा. सु. स. च्या भूमिकेत अभिनेते परेश रावळ आणि डावीकडे माननीय पंतप्रधान चालत आहेत आणि ते माननीय पंतप्रधानांना या यशस्वी मोहिमेबद्दल माहिती देत आहेत असे हे दृष्य  आहे. या दृष्यात प्रेक्षकांना पंतप्रधानांची भूमिका करणाऱ्या अभिनेत्याचे पांढरे केस आणि दाढी दिसते, बाकीचा चेहरा नाही. म्हणून प्रेक्षकांना वाटते की माननीय पंतप्रधानांचा चेहरा दाखवणार नाहीत, जो या पूर्वीच्या काही अशा विषयांवरच्या चित्रपटांनी पाडलेला प्रघात होता. पण तसे न रहाता, रा. सु. स. आणि माननीय पंतप्रधान समारंभाच्या कक्षात आल्यावर बॉडी हार्नेसवर बांधलेला कॅमेरा या दोघांच्या समोर येतो आणि रजित कपूर हा अभिनेता माननीय पंतप्रधानांच्या भूमिकेत समोर येतो आणि हा प्रेक्षकांसाठी एक चांगला सुखद धक्का ठरतो! तरीही ते पंतप्रधान आहेत हा उल्लेख कुठेही केला नाहीये. त्यांना संबोधताना अन्य पात्रे, "सर" असेच म्हणताना दाखवले आहे. प्रेक्षकांनी समजून घ्यायचे की ते माननीय पंतप्रधान आहेत! या समारंभात अभिनेता योगेश सोमण हे तत्कालीन संरक्षण मंत्र्यांच्या भूमिकेत दिसतात. गृह मंत्र्यांची भूमिका करणाऱ्या अभिनेत्याचे नाव कळू शकले नाही पण तो अभिनेता बराचसा सध्याच्या गृह मंत्र्यांसारखा दिसतो. किंबहुना तसे दिसणे हाच निकष असावा त्या अभिनेत्याचा निवडीचा असे वाटते. इथे एक गोष्ट आवर्जून नमूद करावी लागेल. विक्रम गायकवाड यांनी सर्व अभिनेत्यांची रंगभूषा इतकी उत्तम केली आहे की तो कलाकार म्हणजे प्रत्यक्ष ती व्यक्तीच वाटावी!

सत्य घटनांवर आधारित हा चित्रपट असला तरी सर्व त्या घटनांमधील सर्व व्यक्तींची नावे तशीच न ठेवता पात्रांना वेगळी नावे देणे हे बरेचदा गरजेचे ठरते आणि त्या अनुषंगाने मूळ घटनाक्रमात नसलेले काही प्रसंग चित्रपटाच्या कथानकात पेरावे लागतात. मेजर विहानच्या अल्झायमर झालेल्या आईची भूमिका स्वरूप संपत यांनी उत्तम वठवली आहे. तर वर उल्लेख केलेल्या या समारंभात, "आई मला पूर्णपणे विसरण्याआधी मी काही दिवस दिल्लीत तिच्या सोबत राहू इच्छितो." हे कारण सांगून मेजर विहान मुदतपूर्व निवृत्तीची मागणी करतो. त्यावर माननीय पंतप्रधान त्याची बदली दिल्लीतील मुख्यालयात करण्याची आणि आईसाठी एक पूर्णवेळ परिचारिका घरात ठेवण्याची सूचना करतात. अशाप्रकारे मेजर विहान कार्यरतही रहातो आणि दिल्लीत त्याच्या आईजवळही राहतो. तिथे असताना त्याच मुख्यालयात कार्यरत असलेल्या वायुदलातील एका महिला हेलिकॉप्टर पायलट सिरत हिच्याबरोबर त्याचा संपर्क येतो आणि प्रेक्षकांना वाटते की या दोघांमध्ये प्रेम संबध जुळले जाताना दाखवणार आहेत का? पण अशा वेगवान कथानकाच्या चित्रपटांमध्ये या गोष्टींना वेळ कुठे असतो? त्या पायलटवर एका बचाव मोहिमेत दिरंगाई दाखवल्याबद्दल "चौकशी" चालू असते म्हणून तिला कदाचित निलंबित न करता ती चौकशी पूर्ण होईपर्यंत दिल्लीतील मुख्यालयात कार्यरत ठेवलेले दाखवले आहे. आणि मेजर विहानच्या आईसाठी नियुक्त केलेली परिचारिका ही प्रत्यक्षात परिचारिका नसून एक कर्तबगार रॉ एजंट आहे हे रहस्य प्रेक्षाकांपासून फार काळ लपून राहात नाही. ज्या प्रसंगातून हे रहस्य उघड केले आहे तो प्रसंग सर्वच कलाकारांनी उत्तम वठवला आहे. यामी गौतम या गुणी अभिनेत्रीने पल्लवी शर्मा या रॉ एजंटची भूमिका व्यवस्थित निभावली आहे. 

काल्पनिक प्रसंगांचा आणि पात्रांचा उल्लेख आलाच आहे तर हेसुद्धा नमूद करावे लागेल की मोहित रैना या अभिनेत्याने साकारलेला कॅप्टन करण कश्यप हा मेजर विहानचा मेहुणा दाखवला आहे. सुट्टीनंतर परत कामावर रुजू झाल्यावर कॅप्टन करण त्याच्या पत्नीबरोबर म्हणजे मेजर विहानच्या बहिणीबरोबर व्हिडीओ कॉलिंगच्या माध्यमातून संपर्कात रहाताना दाखवले आहे, जेव्हा तो परत एकदा बाबा होणार आहे हे त्याला कळलेले दाखवले आहे. असे प्रसंग युद्धपटांमध्ये का घालतात हे मला अद्याप कळले नाहीये!
 
चित्रपाटाचे कथानक पुढे सरकताना, हवाई दलाच्या पठाणकोट येथील तळावर ०२/०१/२०१६ रोजी झालेल्या हल्ल्याचे वार्तांकन वृत्तवाहिन्यांवर जसे दाखवले गेले होते तसे चित्रपटात दाखवले आहे. हा हल्ला चालू असताना सुरक्षा समितीच्या बैठकीत रा. सु. स., हे माननीय पंतप्रधान, आणि सुरक्षा समितीच्या अन्य सभासदांना सर्व माहिती पुरवतात आणि सशस्त्र दलांना कारवाईचे आदेश देतात असे दाखवले आहे. इथे एका विशेष तपशीलाकडे लक्ष दिले आहे आणि ते मला फार आवडले. मोबाईल फोनवर सुरक्षा विषयक कोणतीही माहिती अथवा बातमी आली, किंवा सशस्त्र दलांना मोबाईल फोनवरून सूचना देऊन झाली की रा. सु. स. तो मोबाईल हॅन्डसेट नष्ट करतात असे दाखवले आहे. काही वर्षांपूर्वी लोकप्रिय असलेले फ्लिप फोन यासाठी वापरले आहेत. आजच्या सारखे स्मार्ट फोन्स नाहीत. आणि तो हॅण्डसेट नष्ट करताना सामान्य परिस्थितीत जशी त्याची घडी घातली जाते त्याच्या विरुद्ध दिशेने वळवून तो हॅण्डसेट तोडलेला दाखवला आहे. मग रा. सु. स. यांचा स्वीय सचिव त्यांना दुसरा हॅण्डसेट देतो असेही दाखवले आहे. असे किती हॅण्डसेट खर्ची घातलेत हे मोजायला हवे होते!

मग येतो चित्रपटाचा मुख्य प्रसंग, उरी येथील तळावर झालेला दहशवादी हल्ला. याही प्रसंगात सर्व बंदुका, रॉकेट लाऊंचर्स आणि त्यांनी केलेले स्फोट हे खोटे वाटत नाहीत. प्रेक्षागृहातली सराउंड साउंड सिस्टिम प्रेक्षकांना ऑन द एज ऑफ द सीट ठेवते. या हल्ल्याची दृष्ये खूपच परिणामकारक आहेत. बराकींमध्ये असलेले नि:शस्त्र सैनिक दहशतवाद्यांच्या गोळीबाराला बळी पडताना पाहून प्रेक्षक व्यथित झाले नाहीत तरच नवल. सैनिकांच्या  हल्ल्याला उत्तर देणाऱ्या जवानांचा एकमेकांमधला ताळमेळ फार उत्तम प्रकारे दर्शवला आहे. आणि तो इथे वाचण्यापेक्षा मोठ्या पडद्यावरच पाहावा! या हल्ल्यात कॅप्टन करण हुतात्मा होतो असे दाखवले आहे.

आता सुरू होते ती प्रतिशोधाची तयारी. पुन्हा एक सुरक्षा समितीची बैठक, पुन्हा थोडी चर्चा आणि मग ठरते प्रतिशोधाची पद्धत - सर्जिकल स्ट्राईक! रा. सु. स.च्या भूमिकेत परेश रावल यांनी जीव ओतलाय असे म्हणणे वावगे ठरू नये. "ये नया हिंदोस्ता है, ये अंदर घुसेगाभी और मारेगा भी!" असं म्हणताना आपले सैनिक गमावल्याचे दु:ख आणि एलिट फोर्सचे हे सैनिक हा प्रतीशोध यशस्वी करतीलच हा सार्थ आत्मविश्वास परेश रावल यांनी उत्तम प्रकारे दर्शवला आहे. सर्जन म्हणजे शल्यविशारद, एक असा डॉक्टर जो रुग्णाच्या शरीरात त्याच्या हत्यारांनिशी योग्य ठिकाणी पोहोचतो, दुखापत झालेल्या किंवा रोगी अवयवावर योग्य ते उपचार करतो, रोग पसरू नये याचे खबरदारी घेऊन शस्त्रक्रिया झालेला शरीराचा भाग पूर्ण बंद करून रुग्ण संपूर्ण बरा होईल याची खबरदारी घेतो. यात एखादी छोटीशी चूक रुग्णाच्या तब्येतीच्या दृष्टीने महाग पडू शकते. म्हणूनच अशा सर्जिकल प्रिसिजनने केलेल्या हल्ल्याला सर्जिकल स्ट्राईक हे किती सार्थ नाव आहे ना?

ज्या दोन रेजिमेंट्सचे सैनिक उरी येथील हल्ल्यात बळी पडले होते त्याच डोगरा आणि बिहार रेजिमेंट्सच्याच सैनिकांना या सर्जिकल स्ट्राईकसाठी तयार केलेले दाखवले आहे. प्रत्यक्षात तसेच घडले होते का हा सिनेमॅटिक लिबर्टीचा भाग आहे हा संशोधनाचा विषय आहे. २० सैनिकांची एक अशा ४ तुकड्या करून त्यांना अल्फा, ब्राव्हो, चार्ली आणि डेल्टा अशी नावे दिली जातात. पैकी ब्राव्हो, चार्ली आणि डेल्टा या तीन तुकड्या तीन वेगवेगळ्या हेलिकॉप्टर्समधून पुढे जातात आणि अल्फा टीम थोड्या विलंबाने निघते. या हेलिकॉप्टरची पायलट असते तीच मुख्यालयात ओळख झालेली कॅप्टन सिरत! अभिनेत्री कीर्ती कुल्हारी हिने ही छोटीशी भूमिका छान सादर केली आहे. आता या मुख्य सर्जिकल स्ट्राईक्सची दृष्ये चित्रित करणे हे लेखक दिग्दर्शक आदित्य धर यांच्या कल्पनाशक्तीवर अवलंबून होते आणि त्यात कुठेही कमतरता दिसली नाहीये. हे सर्व ८० सैनिक साकारणारे कलाकार हे खरोखरचे सैनिकच वाटतात!

या सर्जिकल स्ट्राईकची योजना ठरताना मेजर विहान शेरगील हा दिल्लीतील मुख्यालयात रुजू असतो. त्याला एवढेच कळते की उरी हल्ल्याच्या प्रतिशोधाची तयारी केली जात आहे. तो लगेच लष्कर प्रमुखांकडे जाऊन त्याला या मोहिमेत समाविष्ट करण्याची विनंती करतो आणि सर्व सैनिकांना जिवंत परत आणायचे आश्वासन लष्कर प्रमुखांना देतो. मोहिमेच्या आधीच्या शेवटच्या बैठकीत माननीय पंतप्रधान या वचनाचा उल्लेख करतात तेव्हा मेजर विहान त्यांना म्हणतो, "विथ युअर परमिशन सर, आय अँड माय टीम वूड लाईक टू हॅव डिनर विथ यु आफ्टर वी  कम बॅक!" आणि असं म्हणतानाचा विकी कौशल या कलाकाराचा कायिक आणि वाचिक अभिनय फारच छान झाला आहे. चित्रपट संपतो तो या डिनर पार्टीच्याच प्रसंगाने! चित्रपटात इतर अनेक तपशील दाखवले आहेत, कधी विस्ताराने तर कधी सूचकपणे, पण ते सगळे इथे लिहीत बसलो तर या लेखाचा विस्तार अजून वाढेल. शिवाय ते सांगून वाचकांचा रसभंग नको व्हायला! कारण ते सारे तपशील आणि दोन भन्नाट सरप्राईज एलिमेंट्स  हे सारे चित्रपटगृहातच जाऊन पहावेत असेच आहेत.


संपूर्ण चित्रपटाचेच चित्रिकरण उत्तम आहे. चित्रपटात वापरलेली सर्व शस्त्रे खरी असावीत अशीच वाटतात. त्यांच्या वापराने होणारे स्फोट आणि त्या स्फोटाने होणारे नुकसान हे अन्य चित्रपटांमधल्या अशाप्रकारच्या गोळीबाराच्या किंवा युद्धप्रसंगांपेक्षा अनेक पटींनी प्रभावीपणे चित्रित केले आहेत. आजकाल सर्व चित्रपटगृहांमध्ये सराउंड साउंड सिस्टीम असतेच. गोळीबाराचे आणि स्फोटांचे या सिस्टीममार्फत ऐकू येणारे आवाज या प्रसंगांची परिणामकारकता कैक पटींनी वाढवतात. जिथे हा सर्जिकल स्ट्राईक करायचाय त्या भागाच्या उपग्रह प्रतिमा संरक्षण विभागाकडे थेट प्रक्षेपित होण्याची व्यवस्था कशी केली गेली, वॉर रूममधल्या सर्व तांत्रिक गोष्टी, संगणकावर दिसणाऱ्या उपग्रह प्रतिमा मोठ्या पडद्यांवर दिसणे या टेक्नॉलॉजीच्या गोष्टी आतापर्यंतच्या भारतीय युद्धपटांमध्ये फार क्वचित दिसल्या होत्या त्या इथे दिसतात, आणि या चित्रपटाची निर्मिती मूल्ये किती उच्च आहेत याची साक्ष देतात. तसेच त्या प्रतिमांचा उपयोग करून दहशतवाद्यांची लाँच पॅड्स कशी ओळखली आणि त्या जागांचे कोऑर्डिनेट्स त्या चारही टीम्सकडे कसे पोहोचवले, मगाशी उल्लेख केलेले सरप्राईज एलिमेंट्स  काय आहेत आणि त्याचा कसा उपयोग केला आहे हे बघणे हा एक उत्कृष्ठ अनुभव आहे. एकंदरीत या चित्रपटाचा प्रभाव चित्रपटगृहातून बाहेर आल्यावर बराच वेळ राहातो. आधुनिक काळातला हा सर्वोत्कृष्ठ युद्धपट ठरेल. हो युद्धपटच, कारण असे दहशवादी हल्ले हे प्रॉक्सी वॉरच असतात!

मोहिमेवर जाताना आणि मोहीम यशस्वी करून परत आल्यावर मेजर विहान आपल्या सहकाऱ्यांचे मनोबल उंचावण्यासाठी नेहमी म्हणत असतो, "हाऊ इज द जोश?" ज्यावर सारे सैनिक, "हाय सर!" असे म्हणजे 'आमचा जोश, उत्साह हा उच्च आहे' असे उत्तर देत असतात! म्हणूनच हा चित्रपट पाहून भारतीय सैन्यात आणि जनमानसात निर्माण झालेला जोश तसाच कायम राहावा आणि ज्या कारणासाठी हा सर्जिकल स्ट्राईक करावा लागला, तशी कारणेच पुन्हा उद्भवू नयेत ही इच्छा व्यक्त करून आजच्या पुरता हा लेखनाचा उद्योग थांबवतो. जय हिंद!

दिवस अकरावा पान अकरावे
११/०१/२०१८
मुलुंड मुंबई
 
ता. क.:

अचानक या चित्रपटाचे केलेले रसग्रहण वाचल्यावर अनेकांनी टिपण्णी केली होती की प्रमुख कलाकारांची नावे आणि त्यांनी साकारलेल्या भूमिका, दिग्दर्शक यांची यादी लिहावी. ती पुढील प्रमाणे:

मेजर विहान शेरगील: विकी कौशल
कॅप्टन कारण कश्यप: मोहित रैना (पदार्पण)
वायुदलातील कॅप्टन सिरत: कीर्ती कुल्हारी
रॉ एजंट पल्लवी शर्मा: यामी गौतम
पंतप्रधान: रजित कपूर
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार: परेश रावळ
संरक्षण मंत्री: योगेश सोमण
मेजर विहानची आई: स्वरूप संपत

लेखक आणि दिग्दर्शक: आदित्य धर
निर्माते: रॉनी स्क्रूवाला
निर्मिती संस्था: आर एस व्ही पी
संगीत: शैशव सचदेव
चित्रीकरण प्रमुख: मितेश मिरचंदानी
संकलन: शिवकुमार पाणीककर
रंगभूषा: विक्रम गायकवाड

चुकीची दुरूस्ती: आज दिनांक २५/०१/२०१९ रोजी पुन्हा एकदा हा चित्रपट पहाताना 'करण कश्यप'चा लष्करातला दर्जा कॅप्टन नसून मेजर आहे हे लक्षात आले. मुळ लेखात बदल न करता तळटिप म्हणून ही दुरुस्ती केली आहे. चुकी बद्दल क्षमस्व!