Saturday 27 January 2024

आत्म्याचा परमात्म्याबरोबर संवाद - भेटीआधीचा आणि भेटी नंतरचा

भेटीआधीचा संवाद:

तो: गेल्या दोन वर्षांत तीन वेळ आलास आमच्या गावात पण भेटला नाहीस? का रे बाबा? का रूसलायस का माझ्यावर?

मी: रूसलो नाही देवा, तुमचे भक्त कसे रूसतील बरं तुमच्यावर? पण असं म्हणतात ना की तुम्ही बोलावल्याखेरीज भेट होत नाही तुमची? 

तो: इतका जवळ आला होतास ना, तेच बोलावणं होतं रे! भक्त भेटीला येतात ते हवं असतं आम्हालाही. 

मी: क्षमा असावी देवा, मला तुमचे बोलावणे लक्षात आले नाही. एक मर्त्य जीव, तुमचा एक पामर भक्त म्हणून ही माझी चूक तुम्ही पोटात घ्यावी ही हात जोडून विनंती करतो. 

तो: काळजी करू नकोस वत्सा, मी माझ्या भक्तजनांवर चिडत नसतो. तुझ्यासारख्या खऱ्या भक्तांच्या अशा छोट्या चुका आम्ही माफ करत असतो. इतका जवळ येऊनही तू भेटीला आला नाहीस हा काही तुझ्या अपराध नाही. आणि तुला तर माहीतच आहे, शिशुपालचा वध करण्याआधी त्याचे शंभर आपराध माफ केले होते. तेव्हा निश्चिंत रहा. 

मी: हे तुमचे उपकार कसे विसरू शकेन मी, परमेश्वरा? अशीच कृपा दृष्टी असू द्या माझ्यावर आणि तुमच्या सर्व भक्तजनांवर. 

तो: तथास्तु! काय रे, एक विचारू का?

मी: परवानगी का मागताय, देवा? आज्ञा करा, हक्क आहे तो तुमचा!

तो: बरं बरं. मला एक सांग, तुकोबा तुझ्या स्वप्नात आले तसा लगेच वेळ काढून त्यांच्या गावी गेलास, तो कसा काय?

मी: तुमचीच योजना ती, तुम्हीच तुमच्या परम भक्ताला पाठवले असणार माझ्या स्वप्नात. 

तो नुसता हसला!

मी: विठूराया, तुमचे हे स्मितहास्य द्वापर युगात अर्जुनालासुद्धा बुचकळ्यात पाडत होते आणि आज कलियुगात मलाही कोड्यात पाडत आहे! मला हे कळते की सर्वश्रेष्ठ धनुर्धर असलेल्या अर्जुनासोबत माझी काहीच तुलना होऊ शकत नाही. पण तुम्ही आता असे का हसलात ते कळू दे मला. 

तो: येतोयस ना दोन चार दिवसांनी आमच्या गावात? या वेळेस नक्की भेट. तेव्हा कळेल तुला मी आता असा नुसता का हसलो ते. 

मी: होय, यंदा येणारच आणि काहीही झालं तरी या वेळेस तुमचे दर्शन घेणारच! आणि ते निव्वळ मुख दर्शन नसेल, पदस्पर्श दर्शन असेल यासाठी माझा प्रयत्न असेल. 

तो: तथास्तु!

मी: तुकोबा स्वप्नात आले तो दिवस अत्यंत मंतरलेला गेला ही तुम्हाला माहीत आहेच. आणि इंद्रायणी किनाऱ्याच्या त्या भव्य गाथा मंदीरात तुम्ही आणि रखुमाईने मला सर्व ज्ञात, अज्ञात, दृष्य, अदृष्य बंधानांतून मुक्त केलेत, त्यासाठी मी तुमचा सदैव ऋणी राहीन. तो दिव्य आणि दैवी अनुभव अनेक जन्म लक्षात राहील. तीन महीने झाले आता त्या घटनेला आणि तुमचे आणि रखुमाईचे आशीर्वाद माझ्यावर कायम आहेत ही जाणवत आहे मला. ते तसेच राहू देत ही विनंती. 

तो: तथास्तु! ये लवकर, जवळून दर्शन देतो तुला!

मी नि:शब्द!


भेटीनंतरचा संवाद:

सोलापूर आणि पंढरपूर इथली कामे आटोपून मी आणि माझा एक मित्र त्या दिवशी संध्याकाळी सहा नंतर विठ्ठल मंदिरात पोहोचलो. पदस्पर्श दर्शन होईल ही व्यवस्था विठ्ठलानेच आमच्या ग्राहकाच्या संपर्कातील एका व्यक्तीमार्फत करून ठेवली होती. विठोबा जेव्हा त्याच्या खऱ्या भक्ताला भेटीसाठी बोलवतो तेव्हा ती भेट निर्वेध व्हावी याची व्यवस्थासुद्धा तोच करतो, ती ही अशी! अन्य भक्तजणांसोबत मी आणि माझा हा मित्र रांगेतून पुढे सरकत विठोबाच्या समक्ष पोहोचलो आणि............

तो: आलास. प्रवास कसा झाला? कामे झाली का सगळी? 

मी: होय देवा. 

तो: या गावातल्या एका रुग्णालयाचे काम पूर्ण झालेय आणि दुसऱ्या एका रुग्णालयाचे काम चालू आहे ना? झाली आहेत का ती कामे तुला हवी तशी? 

मी: होय देवा. तुम्ही तर परमात्मा आहात, त्यामुळे, 'इथली कामे रुग्णालयाची आहेत आणि त्या कामांच्या गुणवत्तेबाबत मी किती आग्रही आहे हे तुम्हाला कसे माहीत?' हा प्रश्न बिनकामाचा आहे याची कल्पना आहे मला. 

तो: हुशार आहेस. 

मी: तुमचीच कृपा आहे ही!

तो पुन्हा नुसताच हसला!

मी: हे बघा, परत तेच बुचकळ्यात पाडणारे मिश्किल स्मित हास्य! सांगा की देवा, असे का हसलात ते? 

तो: सांगतो, पण त्या आधी एका प्रश्नाचे उत्तर दे. 

मी: विचारा की, देवा. यथा मती उत्तर देईन. 

तो: देहूला साखळ्या तुटून नष्ट होण्याचा जो अनुभव मी तुला दिला, तो इथे पंढरीतसुद्धा येईल असे वाटत होते का रे तुला?

मी: तुमच्याशी खोटे नाही बोलणार. हो, तसा काही अनुभव पुन्हा येईल, यावा असे वाटत होते आतून. 

तो: बाळा, असे दिव्य आणि दैवी अनुभव वारंवार येत नसतात तुम्हा मानवांना. अनेकांना असे अनुभव येतही नाहीत. काहीच नशीबवान लोकांना असे अनुभव येतात, ते ही योग्य वेळीच. तुझ्या बाबतीत तुझे नशीब आणि ती वेळ जुळून येण्याचा योग तीन महिन्यांमागे आला होता म्हणून तुला तो अनुभव आला. त्या आधीही आला नसता आणि नंतरही नाही. 

पुढे ऐक. तुकोबांमार्फत देहूला मी तुला बोलावले त्याची काही कारणे आहेत. साडेसात वर्षे म्हणता म्हणता शनि महाराजांनी तुझी आठ वर्षे परीक्षा घेतली आणि त्या सर्व कठीण काळाला तू किती धीराने सामोरा गेलास ते मी आणि तुझी रखुमाई पाहत होतो आणि अस्वस्थ होत होतो. पण तुझी आंतरिक प्रगती होत होती आणि या कठीण काळातसुद्धा तुझ्यातली सकारात्मकता फक्त टिकून न राहाता, वाढत होती या दोन्ही गोष्टींचा आनंदही होत होता.

हात जोडलेला नतमस्तक मी: शनि महाराज आणि तुमची कृपादृष्टी, दुसरे काही नाही. 

तो: तर तुझ्या या परीक्षेचे गोमटे फळ तुला मिळाले पाहिजे अशी माझी आणि रखुमाईची सुद्धा इच्छा होती. बावीस वर्षांमगे तुझ्या स्वप्नात येऊन आम्ही तुला आमच्या मूळ रूपात दर्शन दिले आणि तू त्या स्वप्नाचा अर्थ शोधत आहेस हेही आम्हाला माहीत होते. पण वत्सा, तुला कल्पना आहे का की, तुझे ते प्रयत्न किती तोकडे होते? त्या स्वप्नात तुला काय संदेश मिळाला हेही तुला नाही कळले!

मी: मला कल्पना आहे त्याची. तरीही, ज्या व्यक्ती मला वेळोवेळी योग्य वाटल्या, त्यांना त्यांना मी ही स्वप्न सांगत होतो, त्याचा अर्थ विचारात होतो आणि मला एकच उत्तर मिळत होते, "भगवान विष्णू आणि लक्ष्मी देवी तुझ्या आयुष्यात येणार आहेत." पण तुम्हाला सांगतो देवा, या उत्तराने माझे जराही समाधान होत नव्हते. म्हणजे ज्या व्यक्तींना मी या स्वप्नाचा अर्थ विचारला ते सर्व विद्वान आणि आध्यात्मिक वृत्तीचे आहेत आणि त्यांच्या विद्वत्तेबद्दल मला सुईच्या अग्राएवढीही शंका नाही, पण त्यांनी दिलेल्या उत्तराने माझे समाधान होत नव्हते हेच खरे!

तो: तुझा हेतू शुद्ध होता हे माहीत होते मला. पण तुला त्या स्वप्नाचा अर्थ समजावा एवढी तुझी आंतरिक प्रगती झाली नव्हती म्हणून तुला तुझ्या त्या स्वप्नाचा अर्थ लगेच कळला नाही, आम्ही कळू दिला नाही!

पुन्हा हात जोडलेला नि:शब्द मी!

तो: तुम्हा मानवांची अशी आंतरिक प्रगती इतक्या सहज होत नाही रे, बाळा! आणि कलियुगात तर ते खूपच दुरापास्त आहे. पण तू थोडा वेगळा आहेस. 

मी: वेगळा? म्हणजे? 

तो: तुला प्रश्न फार पडतात बाबा! वकील व्हायचास तो अभियंता कसा काय झालास? सांगतो, ऐक. तुझ्या सारखे धनू राशीचे लोक खूप आनंदी जीवन जगतात, खुल्या विचारांचे असतात, तुमचे सर्व कारभार सचोटीचे असतात. इतरांचे प्रश्न समजून घेऊन त्यांना त्यांच्या अडचणीत मदत करण्याची तुमची वृत्ती असते. पण तुझा एक गुण म्हणजे स्वत:च्या मर्यादा फार पटकन ओळखतोस तू आणि त्या मर्यादेत राहूनच जशी जमेल तशी इतर लोकांना मदत करतोस. तेव्हा आमच्या मनात विचार आला की तुझ्या मर्यादा कमी कराव्यात आणि तू इतरांना मदत करतोस त्याचा आवाका वाढेल असे काही करावे. 

पुन्हा तसाच हात जोडलेला नि:शब्द नतमस्तक मी विठोबा काय सांगतोय ते फक्त मनोभावे ऐकत होतो. मनात अनेक प्रश्न उपस्थित होत होते. चंद्रभागेच्या निर्मळ पाण्यात बुडून जावे तसाच मी विठोबाच्या वाणीत बुडून गेलो होतो!

तो: तसंच, द्विधा मनस्थिती हा ही धनुराशीचा एक गुण म्हणून ओळखला जातो, तो एक तुझ्यात नाहीये. तू एखादा निर्णय घ्यायला वेळ लावतोस, तुझी द्विधा मनस्थिती निर्णय घेण्यात असते. पण एकदा घेतलेला निर्णय सहजासहजी बदलत नाहीस. हाच तुझा वेगळेपणा आहे. त्यासाठीच, घेतलेला निर्णय निभावून नेण्याची शक्ती तुझ्यात यावी म्हणून मी आणि रखुमाई आमच्या मूळ रूपात तुला स्वप्नात दिसलो होतो. आता परत जेव्हा ध्यान करशील तेव्हा त्या स्वप्नाआधीचा तू आणि नंतरचा तू, हा फरक स्वत:साठीच आठवून पहा एकदा. 

मी: होय देवा, आजच हा प्रयत्न करतो. पण तरीही सर्व ज्ञात, अज्ञात, दृष्य, अदृष्य बंधने नष्ट व्हावीत यासाठी बावीस वर्षे हा खूप मोठा काळ नाही का? 

तो: यालाही तेच उत्तर आहे, जे मगाशी संगितले, वेळ आणि नशीब जुळून येणे! ध्यान धारणा हा वैश्विक शक्तीबरोबर संपर्क करण्याचा मार्ग आहे ही जेव्हा तुला कळले तशी तुझी आंतरिक प्रगती होत गेली आणि त्याकडे आमचे लक्ष होते. पण या ध्यानधाराणेद्वारे तुझ्या कामातल्या तांत्रिक प्रश्नांची उत्तरे तुला मिळणे या पलीकडे तुझी प्रगती झाली नाही, कारण ध्यानधाराणेत सातत्य नसणे. आता वेळ आणि नशीब जुळून येणे म्हणजे काय, तर तुकोबा तुझ्या स्वप्नात येण्याच्या काही काळ आधी तुझे ध्यान करण्यातले सातत्य जरा वाढले होते त्यामुळे तू बंधमुक्त होण्याची वेळ जवळ येत होती. इंद्रायणीच्या पूर्व किनाऱ्यावरच्या त्या पूर्वाभिमुख गाथा मंदिराचे उद्घाटन तू तिथे आलास त्याच्या एक सव्वा वर्ष आधीच होणे आणि त्या मंदिरातल्या आमच्या मूर्तीची रूपे ही तुझ्या जुन्या स्वप्नातल्या आमच्या मूळ रूपांसारखी असणे ही तुझे नशीब. समजले का आता?

मी: समजले विठूराया, समजले! 

तो: आता कळले का, मी कधी कधी नुसते स्मित हास्य का करतो ते?

मी: होय पांडुरंगा. 

तो: पुन्हा माझी भेट घ्यावीशी वाटली तर इंद्रयाणीकाठी किंवा तिची मोठी बहीण असलेल्या चंद्रभागेकाठी कधी जाता येईल याची वाट पाहू नकोस. माझे वास्तव्य तुझ्याच गावात, भीमा आणि इंद्रायणी यांची सगळ्यात धाकटी बहीण असलेल्या मुठा नदीकिनारीसुद्धा आहे. तिथे येऊन भेट. 

मी: तुम्ही तर चराचरांत आहात, देवा. आणि आता तुमची अजून एक जागा म्हणजे माझे हृदय. यापुढे जेव्हा तुमच्याबरोबर संवाद साधावासा वाटेल तेव्हा शांत बसून फक्त माझ्या हृदयची स्पंदने ऐकत राहीन!

तो: यशवंत हो, धनवान हो, कीर्तीवंत हो. 

मी: पांडूरंगहरी, रामकृष्णहरी....................


दिवस सत्तावीसवा पान सत्तावीसवे 

दिनांक २७ जानेवारी २०२४. 

विठ्ठलवाडी, पुणे!

7 comments:

  1. अतिशय सुंदर लेख.

    ReplyDelete
    Replies
    1. Nilesh Kelkar

      Delete
    2. अतिशय सुंदर.... खूपच भावनिक?💐💐 पांडुरंगाची कृपा सदा राहू दे तुमच्यावर!! पांडुरंग हरी!🙏🙏

      Delete
  2. खूप छान , चिंतनातून आपली वैचारीक आध्यात्मिक प्रगती होऊन आपण परमात्म्याच्याशी संवाद साधू लागतो हे अगदी सहजरीत्या लेखणीतून साकारलेलं आहे ! असेच संवाद सर्व भक्त आपल्या आवडल्या देवीशी साधतात आणि तोही प्रतिसाद देत असतो ! आपल्याला सर्व संकेत समजणे कठीण होते 🙏 जय हरी विठ्ठल 🙏

    ReplyDelete
  3. जयंत वासुदेव जोशी:
    " व्वा.... किती सहज, सुस्पष्ट विचार व्यक्त केले आहेस! आध्यात्मिक पातळी वर तुझी प्रगती पाहून खूप आनंद वाटला!! तुझ्या निर्लेप व्यक्तिमत्त्वाचा नवा पैलू असाच प्रकाशमान होत राहो! लेखन कला ही स्पृहणीय!

    ReplyDelete