Monday 14 January 2019

संजय उवाच

सन २००४ ते सन २०१४ या काळात भारतीय राजकारणात काय काय झालं आणि देशभरात त्याचे काय काय आणि कसे कसे पडसाद उमटले ते सर्व भारतीयांनी अनुभवलं आहे, आणि सर्व १२५ कोटी जनतेची त्याच्याबद्दल आपापली मते असतील. ती मते बरोबर आहेत का चुक, भारतीय माध्यमांनी म्हणजे दूरचित्रवाणीवरील वृत्त वाहिन्या आणि वृत्तपत्रे यांनी त्या सर्व घटनांचे त्या त्या वेळी विश्लेषण कसे केले होते, त्या विश्लेषणात किती तथ्य होते याचा उहापोह करणे हा उद्देश ठेवून हा लेखनाचा उद्योग करत नाहीये. तर निमित्त आहे दिनांक ११/०१/२०१९ रोजी प्रदर्शित झालेला संजय बारू लिखित याच नावाच्या पुस्तकावर आधारित चित्रपट द ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर.  

इथे एक गोष्ट मी नमूद करू इच्छितो की मी हे पुस्तक किंवा त्याचा (उपलब्ध असल्यास) कोणताही अनुवाद वाचलेला नाही आणि इथे लिहिलेल्या सर्व गोष्टी या चित्रपटाबद्दलच आहेत.

अपेक्षेप्रमाणे चित्रपट सुरू होतो तो २००४ साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांचा निकाल आणि डॉक्टर मनमोहन सिंग यांची पंतप्रधानपदी निवड होणे या घटनांपासून. मंत्रिमंडळ निवडीच्या वेळी घडलेल्या काही सूचक घटना या दृष्यांमधे आहेत ज्या कदाचित सामान्य भारतीय जनतेला माहीत नाहीत. शपथविधी समारंभानंतरच्या मेजवानीच्या वेळेस त्या सभागृहात बॉडी हार्नेसवर बांधलेला कॅमेरा फिरत ही सगळी दृष्ये टिपत नवनिर्वाचित पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग, पक्षप्रमुख सोनिया गांधी आणि त्यांचा परिवार उभे आहेत, तिथे जात असताना एक व्यक्ती कॅमेरासमोर पाठमोरी येते आणि एका मेजापाशी उभी राहाते. पंतप्रधान त्या व्यक्तीला नजरेनेच थांब असे सांगतात. आणि थोड्या वेळाने ती व्यक्ती म्हणजेच पुस्तकाचे लेखक संजय बारू म्हणजेच अभिनेते अक्षय खन्ना, "सौ करोड की आबादीवाले इस देश को ये कुछ गिने चुने लोग चालते हैं। ये देश की कहानी लिखते हैं और मै, इनकी कहानी लेखता हूं!" असे म्हणत पडद्याच्या दोन मिती छेदून तिसऱ्या मितीत येतात आणि प्रेक्षकांबरोबर थेट संवाद साधतात! चित्रपट इथेच पकड घेतो आणि ती शेवटपर्यंत सुटत नाही. 

पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदा आपल्या कार्यालयाकडे डॉक्टर मनमोहन सिंग जात असताना त्यांनी २००४ साली पंतप्रधानपद स्वीकारेपर्यंत ज्या काही महत्वाच्या हुद्द्यांवर काम केले होते त्या त्या वेळच्या वेशभूषेमधले डॉक्टर मनमोहन सिंग हे पंत्रप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांना अभिवादन करतात असे दाखवले आहे. हा प्रसंग फार उत्तम चित्रित केला आहे आणि त्यांची त्या त्या वेळची वेषभूषासुद्धा अचूक केली आहे.

इथून पुढे प्रेक्षकांना पाहायला मिळते त्या दहा वर्षांत दिल्लीत प्रधानमंत्री कार्यालयात घडणाऱ्या प्रमुख घटना आणि त्या अनुषंगाने तत्कालीन पंतप्रधानांच्या वैयक्तिक आयुष्यात घडणाऱ्या प्रमुख घटना यांचा एक कोलाज! अभिनेते अनुपम खेर यांनी तत्कालीन पंतप्रधानांची भूमिका साकारण्यासाठी घेतलेली मेहनत चित्रपटभर दिसते. चालणे, बोलताना केले जाणारे हातवारे म्हणजेच बॉडी लँग्वेजवर अनुपम खेर यांनी विषे लक्ष दिले आहे. आणि आवाजात केलेला बदल तर ऐकताच राहावा! ते ही भूमिका जगले आहेत असे म्हणणे वावगे ठरू नये. संपूर्ण चित्रपट तत्कालीन पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग आणि त्यांचे तत्कालीन माध्यम सल्लागार संजय बारू यांच्याभोवतीच फिरतो. त्या दोघांमध्ये निर्माण झालेले भावबंधसुद्धा योग्य प्रकारे दाखवले आहेत आणि ते बघायलाच हवेत. संजय बारू यांना बोलावताना डॉक्टर मनमोहन सिंग "संजया" अशी हाक मारताना दाखवले आहे आणि ते मला खूप आवडले. त्यांची माध्यम सल्लागार म्हणून नियुक्ती करताना पंतप्रधान त्यांना म्हणतात, "संजया, महाभारतमे संजय धृतराष्ट्रकी आंख और कान बने थे. तुम मेरी आंख और कान बनो!" 

हा चित्रपटाचे कथानक खुद्द पंतप्रधान, त्यांचे स्वीय सचिव, माध्यम सल्लागार यांच्या भोवती आणि पी एम ओ म्हणजेच पंतप्रधान कार्यालय याठिकाणीच जास्त पुढे सरकते. त्यासाठी नेपथ्य उत्तमच असायला हवे होते आणि कला दिग्दर्शकांनी यात काहीही कमतरता ठेवली नाहीये. चित्रीकरणात ग्रीन स्क्रीन या प्रकाराचा मुबलक वापर केला आहे. पंतप्रधान कार्यालयाच्या बाहेर ज्या इमारती आहेत त्या आणि तिथे उभे असलेले सुरक्षा रक्षक हे कार्यालयाच्या खिडकीतून प्रेक्षकांना दिसत राहातात. चित्रपटाचे बरेचसे चित्रीकरण भारताबाहेर झाले असल्याने असे करणे आवश्यक होते, आणि म्हणूनच ते चतुर प्रेक्षकांच्या लक्षात येऊ शकते. 

तत्कालीन पक्षप्रमुख सोनिया गांधी यांच्या भूमिकेत जर्मन अभिनेत्री सुझान बर्नेट शोभून दिसतात. इथे परदेशीच अभिनेत्री हवी होती कारण कोणत्याही परदेशी मूळ असलेल्या व्यक्तीने हिंदी बोलणे आणि मुळच्या भारतीय व्यक्तीने परदेशी व्यक्तीसारखे अडखळत किंवा त्या प्रकारच्या अक्सेंटमध्ये हिंदी बोलणे यात बराच फरक आहे. आणि सुझान यांनी परदेशी व्यक्तीचा हा हिंदी बोलण्याचा विकनेस उत्तम प्रकारे स्ट्रेंथमध्ये बदलवला आहे! राहुल गांधी यांच्या भूमिकेत अर्जुन माथूर आणि प्रियांका गांधी यांच्या भूमिकेत आहना कुमारा यांची निवड सार्थ आहे. या भूमिका साकारण्यासाठी या दोघांना विशेष मेहनत घ्यायला लागली नसावी असे वाटते. या दोघांचे चित्रपटाच्या कथानकातले स्थान महत्त्वाचे आहेच पण त्यांच्या भूमिकेला फार लांबी नाहीये. बाकी सर्व कलाकार ज्या व्यक्तीरेखा साकारत आहेत त्यांच्या सारखे दिसणे ही एक मुख्य गरज लक्षात ठेवून त्या त्या कलाकारांची निवड केली आहे. म्हणूनच डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या पत्नी श्रीमती गुरशरन कौर यांच्या भूमिकेत दिव्या सेठ, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या भूमिकेत रमेश भाटकर, माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या भूमिकेत राम अवतार, लालकृष्ण अडवाणी यांच्या भूमिकेत अवतार सहानी आणि माजी पंतप्रधान दिवंगत पी व्ही नरसिंहा राव यांच्या भूमिकेत अजित सातभाई हे सर्व कलाकार शोभून दिसतात. तरीही या सपोर्टींग कास्टमध्ये सगळ्यात जास्त भाव खातात ते अहमद पटेल यांच्या भूमिकेत (तसे दिसत नसूनही) अभिनेते विपीन शर्मा! अक्षय खन्ना आणि त्यांचे काही निवडक प्रसंग उठावदार करण्यात या दोघांच्या अभिनयाबरोबरच ज्या ठिकाणी या प्रस्नागांचे चित्रीकरण झाले आहे तेथील परिसरही तितकाच कारणीभूत आहे आणि हे मोठ्या पडद्यावरच पाहायला हवे!





अक्षय खन्ना यांच्या अभिनयाबद्दल लिहिले नाही तर या चित्रपटाबद्दल कोणताच लेख पूर्ण होऊ शकत नाही. वर उल्लेख केल्याप्रमाणे "त्या त्या व्यक्तीसारखे दिसणे" हा एक मूळ निकष लावून कलाकारांची निवड झाली आहे. परंतु २०/०४/२०१४ रोजी संजय बारू लिखित द ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर हे पुस्तक प्रकाशित होईपर्यंत संजय बारू हे कोण आहेत हे फार कमी भारतीयांना माहीत होते. त्यामुळे त्यांची भूमिका करणारा कलाकार त्यांच्यासारखाच दिसला पाहिजे अशी आवश्यकता दिग्दर्शकांना वाटली नसावी. म्हणूनच अक्षय खन्ना हे संजय बारू यांच्यासारखे आजिबात दिसत नसले तरीही ते वावगे वाटले नाहीये. त्यामुळे त्यांना त्यांचा सहज अभिनय करायला पूर्ण वाव होता आणि त्यांनी ही संधी योग्य साधली आहे असेच म्हणावे लागेल. म्हणूनच, "ये जीत आपकी जीत है, ये पी एम ओ आपका टर्फ है।" किंवा "ना ना ना ना। डॉक्टर सिंग मिन्स बिझनेस!" ही वाक्ये त्यांच्या कायिक आणि वाचिक अभिनयामुळेच लक्षात राहतात! संजय बारू यांच्या भूमिकेत अक्षय खन्ना हे सूत्रधारासारखे या चित्रपटात वावरतात आणि त्यांच्याच दृष्टीकोनातून सर्व घटना प्रेक्षकांना दिसतात म्हणून या लेखाला संजय उवाच हे नाव द्यावे असे मला वाटले. 

अपॆक्षेप्रमाणे चित्रपट संपतो तो २०१४ साली झालेल्या निवडणुकांमध्ये झालेल्या सत्ता बदलाने. . . . . . . . 

विजय रत्नाकर गुट्टे यांचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच चित्रपट आहे असे कुठेही वाटत नाही. कथानकावर असलेली त्यांची घट्ट पकड चित्रपट बघताना क्षणोक्षणी जाणवते. ज्याला लूज एंड्स म्हणता येईल अशी एकही गोष्ट चित्रपटात दिसत नाही आणि माझ्यामते हे दिग्दर्शकाचे यश आहे.

भारतीय राजकारणावर भाष्य करणारे आणि राजकारणी व्यक्तींवर आधारित पात्रयोजना असलेले अनेक चित्रपट या पूर्वी प्रकाशित झाले आहेत. त्या सर्वच चित्रपटांमधील पात्रे आणि त्यांचे कथानक काल्पनिक होते. कदाचित द ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर हा भारतीय राजकारणावरील पहिला चित्रपट असावा ज्यातील बहुतेक पात्रे म्हणजेच त्या व्यक्ती जिवंत आहेत आणि राजकारणात सक्रियसुद्धा आहेत. म्हणूनच पात्रांची आणि व्यक्तींची नावे आहेत तीच ठेवणे आवश्यक होते. शिवाय राजकारणाविषयी प्रगल्भ विचार असलेले भारतीय नागरिक हा बदल सहज स्वीकारतील अशी अशा ठेवायलाही भरपूर वाव आहे. भारतीय राजकारणावर आधारित असेच छान चित्रपट भविष्यातही बनतील आणि प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतील अशी अपेक्षा करून हा लेखनाचा उद्योग आजच्या पुरता थांबवतो. जय हिंद!

दिवस चौदावा पान चौदावे

१४/०१/२०१८
मुलुंड मुंबई









3 comments:

  1. सुरेख लेख। शीर्षक सुद्धा चपखल।

    ReplyDelete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete