Saturday, 21 June 2025

भय सापळ्यातून मुक्त व्हा, मोह सापळ्यात अडकू नका.

पोपट कसा पकडतात माहीत आहे? खुप साऱ्या छोट्या छोट्या नळ्या एका दोरीत ओवतात, पोपटाला आवडेल असे खाद्य त्या नळ्यांना चिकटवलेले असते. त्याच्या वासाने पोपट तिथे जमा होतात. पोपट उडून येऊन त्यातल्या एखाद्या नळीवर बसला की त्या पोपटच्या वजनाने ती नळी त्यातून ओवलेल्या दोरीभोवती फिरते आणि पोपट त्या नळीला उलटा लटकतो. अशी अवस्था पोपटाने कधीच अनुभवली नसते, त्यामुळे पोपट त्या नळीला आपल्या पायांत घट्ट पकडून ठेवतो आणि लटकलेला राहतो. अशा वेळेला पोपटला भीती वाटते की नळीवरचे पाय सोडले तर तो खाली पडेल आणि दुर्दैवाने अशा विचित्र आणि कधीही न अनुभवलेल्या परिस्थितीमुळे त्याला त्याच्या पंखांमधल्या ताकदीचा, उडण्याच्या ताकदीचा विसर पडलेला असतो. आकाशात स्वच्छंद भराऱ्या घेणारा पोपट अशा प्रकारे पिंजऱ्यात अडकतो! याला म्हणतात भय सापळा!

माकड कसे पडकतात माहीत आहे का? ते एका अरुंद तोंडाच्या बाटलीत माकडाला आवडेल असा खाऊ ठेवलेला असतो आणि ती बाटली झाडाला घट्ट बांधतात. बाटलीची मान इतकी अरुंद असते की माकड हात आत घालून तो खाऊ पकडतो, पण त्यामुळे त्याची मूठ मोठी होते आणि त्या खाऊ सकट त्याचा हात बाहेर येत नाही आणि त्या माकडाला तो खाऊ सोडताही येत नाही. त्यामुळे ते हात सोडत नाही आणि ते माकड पकडले जाते. बाटलीतला खाऊ सोडून दिला तर ते माकड पकडले जाण्यापासून स्वत:ला वाचवू शकते, आणि ते सापळ्यात अडकते, पकडले जाते. हाच मोह सापळा! 

एखादी गोष्ट अथवा वस्तू आपल्याकडे आहे या भावनेने आपल्याला सुरक्षित वाटत असेल आणि, ‘ती गोष्ट अथवा वस्तू आपल्यापासून दूर गेली तर?’ या निव्वळ कल्पनेनेच आपल्याला भय वाटत असेल तर सर्व प्रथम त्या वस्तूचा अथवा गोष्टीचा त्याग करावा. काही काळ अस्वस्थ, निराधार वाटेल. पण अल्पावधीतच साक्षात्कार होऊ शकतो की आपण ज्याला आपली सर्वात मोठी कमजोरी समजत होतो, तीच आपली ताकद आहे! वेगळ्या शब्दांत सांगायचे तर त्या वस्तूचा अथवा गोष्टीचा मोह सोडून दिला पाहिजे कारण तो मोह हीच आपली कमजोरी असू शकते!

कुठले तरी हवे हवेसे वाटणारे क्षण, अनुभव हातातून सुटून जाऊ नये म्हणून ते घट्ट धरून ठेवायाचा प्रयत्न करताना आपल्या भोवती एक कोष तयार करत राहतो, ज्यात आपल्याला सोबत फक्त ते हवे हवेसे वाटणारे क्षण, अनुभव असतात. आणि आपण आपले सामान्य दैनंदीन आयुष्य जगत असतोच, पण ते या कोषात राहूनच. आणि त्यांच्या मुळे आपल्याला एक प्रकारच्या सुखाचा आभास होत राहतो, पण प्रत्यक्षात तो एक कोष नसून आपणच आपल्याच भोवती एक सापळा रचलेला असतो, हाच तो भय सापळा आणि मोह सापळा! ते सुंदर वाटणारे क्षण, अनुभव आपण घट्ट पकडून ठेवतो कारण ते क्षण, अनुभव जर निघून गेले तर काय होईल याला आपण घाबरत असतो. 

अशा वेळी आपल्या खऱ्या क्षमता, आपली खरी ताकद काय आहे याचा विसर पडतो आणि आपण तिथेच तिथेच घुटमळत राहतो. तो पिंजरा, तो सापळा तोडून बाहेर जाण्याचा आपण प्रयत्नही करत नाही! असं कोषात, भयात आणि मोहात अडकून राहण्याचे दुष्परिणाम घडत असतात पण आपले त्याकडे लक्ष जात नाही कारण आपण त्या दुष्परिणामांकडे फार गांभीर्याने पाहत नाही. अशा आभासी जगात राहत असताना काही चांगल्या संधी हातातून सुटून जाऊ शकतात.  
 
एखाद्या भावनेत अथवा विचारात अडकून राहिलं की कधीकधी खूप मोठी घुसमट होते. आणि अन्य चांगले पर्याय समोर असूनही दिसत नाहीत, ते झाकोळलेले आणि त्यामुळे दृष्टीआड राहतात, आणि कदाचित त्या घुसमटीतून बाहेर पडण्याची एखादी मोठी संधी हुकते! म्हणून सर्व प्रथम तो विचार अथवा ती भावना झटकून टाकली पाहिजे आणि अन्य पर्यायांसाठी मनाची कवाडं उघडली पाहिजेत. कोणताही पूर्वग्रह न ठेवता ‘कोरी पाटी’ घेऊन आशा पर्यायांकडे सकारात्मकतेने पाहिले पाहिजे. त्यांचा विश्लेषणात्मक विचार करून योग्य वाटतील ते एक अथवा अधिक पर्याय स्वीकारावेत. म्हणजेच भय आणि मोह सापळ्यांमधून मुक्त झाले पाहिजे, तरच आपण स्वच्छंद, मुक्त जीवन जगू शकू. 

थोडक्यात, भय सापळ्यात अडकायचं नाही आणि मोह सापळ्यातून मुक्त व्हायचे. ज्या गोष्टीच्या परिणामांची भीती वाटते तीच गोष्ट करायची, जय गोष्टीचा मोह वाटतो तीच गोष्ट सोडून द्यायची! यासाठी तीन आवश्यकता आहेत. एक, आपल्या स्वत:च्या क्षमतांवर दुर्दम्य विश्वास. दोन, आपण जे काही करतो, आपल्या कृती, ज्यावर आपले स्वत:चे नियंत्रण आहे, त्या सर्वांवर श्रद्धा आणि तीन, आपल्या नियंत्रणात नसलेल्या गोष्टींबाबत सबुरी. हे सारे आचरणात आणताना आपले लक्ष विचलीत करणारे क्षण नक्कीच येतील आपली वाट अडवायला. थोडा काळ विरंगुळा म्हणून तिकडे पाहण्यात हरकत नसावी पण त्यात गुंतून राहू नये, इंग्रजीत ज्याला to get indulged into  म्हणतात, तसे होऊ नये. म्हणजेच मोह सापळ्यात अडकू नये.

आता हे भय सापळ्यातून मुक्त होणे आणि मोह सापळ्यात न अडकणे यासाठी मला सापडलेला मार्ग म्हणजे ध्यान, ज्याला इंग्रजीत meditation म्हणतात, ते करणे. गेली दीड एक वर्षे, विशेषत: देहूला संत शिरोमणि तुकाराम महाराजांच्या गाथा मंदिरात सगळी आसक्ती गळून पडल्यापासून ध्यान करणे बऱ्यापैकी सातत्याने चालू आहे. आणि माझे नशीब थोर म्हणून मला ध्यान करण्याच्या काही विशिष्ट पद्धती ज्ञानी, आध्यात्मिक आणि गुरूतुल्य व्यक्तींकडून शिकायला मिळाल्या. त्या पद्धती आचरणात आणून ध्यान करणे चालू आहे. 

कुठल्याही भयाने ग्रासित न होता, कोणत्याही मोहात न अडकता मला माझा MEP Consultancyचा व्यवसाय प्रामाणिकपणे करता यावा, तो वृद्धिंगत व्हावा ही विठ्ठल चरणी प्रार्थना करून हा लेखनाचा उद्योग आजच्यापुरता थांबवतो. 

रामकृष्णहरी, पांडुरंगहरी, वासुदेवहरी!

-चेतन अरविंद आपटे 
दिवस एकशे त्र्यहत्तरवा पान एकशे त्र्यहत्तरवे
दिनांक २२/०६/२०२५ 
शौर्य दिवस 

Tuesday, 13 May 2025

ती बावीस मिनिटे


कालची संध्याकाळची ती बावीस मिनिटे देशाने आणि जगाने काय पाहिले, काय अनुभवले? माझ्या देशाचे पंतप्रधान, ७५ वर्षांचे तरूण पंतप्रधान देशाला आणि जगाला संबोधत होते. बावीस एप्रिल रोजी सीमेपलिकडल्या दहशतवाद्यांनी केलेल्या नृशंस हत्याकांडाचा बदला घेऊन झाल्यावर, शत्रू राष्ट्राला पुरेशी अद्दल घडवल्यानंतर आणि तिथल्या दहशतवादाच्या कारखान्यांना आपल्या सशस्त्र दलांनी, आपल्या नौदल, वायूदल आणि लष्कराने नष्ट केल्यानंतर ते देशाला आणि जगाला संबोधत होते. त्यांचे भाषण कौशल्य तर ते गुजरातचे मुख्यमंत्री असल्यापासूनच भारताने आणि जगाने पाहिले होते. पण काल, दिनांक बारा मे रोजी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात जो आवेश, जो जोर होता, तो क्वचितच कधी जनतेसमोर आला होता. 

पहलगामला अनेक भारतीय महिलांचे सौभाग्य अतिरेक्यांनी नष्ट केले, स्त्रियांचे सौभाग्य लेणे, म्हणजे हिंदीत ज्याला मांग का सिंदूर म्हणतात, ते नष्ट केले म्हणूनच भारताने दहशतवादाविरुद्ध केलेल्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या कारवाईला Operation सिंदूर हे नाव माननीय पंतप्रधानांनीच सुचवले असे म्हणतात. आणि या operation सिंदूरची उद्दिष्टे साध्य झाल्यानंतर शस्त्रविरामही केला. पण कालच्या भाषणात त्यांनी देशाला आश्वस्त करण्याबरोबरच दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या लोकांना ठणकावून सांगितले की भारतातला कोणताही दहशतवादी हल्ला हा act of war आहे असे समजले जाईल आणि त्याला तोडीस तोड प्रत्युत्तर दिले जाईल हा स्पष्ट संदेश दिला! Operation सिंदूर संपले नाहीये, तात्पुरते स्थगित केले आहे, आणि सीमेपालिकडून परत काही कागाळी केली गेली तर तशा कुरापती करणाऱ्यांची खैर केली जाणार नाही हा नि:संदिग्ध इशारा कालच्या भाषणात होता. 

यापूर्वी कोणत्याही देशाच्या प्रमुखाने दहशतवादाला जोपासणाऱ्या लोकांना अशाप्रकारचा संदेश दिल्याचे माझ्या तरी स्मरणात नाही. या भाषणातली वाक्ये तरी कशी निवडक होती ते पहा, "Terrorism and talks can not happen simultaneously", "Now the talks will be only about POJK.", "खून और पानी एकसाथ नही बह सकता|", "Operation सिंदूर अब आतंक के खिलाफ भारत की नीती है, new normal है|", "हम हर उस जगह जा कर कठोर से कठोर कारवाई करेंगे जहा से आतंक की जडे निकलती है|" या सगळ्यांबरोबरच शत्रू राष्ट्र अण्वस्त्रे वापरण्याची जी धमकी देत असे त्या धमकीलाही माननीय पंतप्रधान यांनी तितकेच रास्त उत्तर दिले. 

हे भाषण काल सर्वांनीच पहिले ऐकले असेल, त्यामुळे त्याच्या तपशीलात मी जास्त जात नाही. पण दिनांक सहा - सात मे यामधील रात्र ते शस्त्रसंधी होईपर्यंत भारताच्या सशस्त्र दलांनी शत्रू राष्ट्राला जी अद्दल घडवली आहे तशी अद्दल, त्यापेक्षा जास्त कठोर शिक्षा दहशतवाद पोसणाऱ्या सर्वाना भविष्यात होऊ शकते असा दिलासा माननीय पंतप्रधान यांनी भारताच्या भारतात आणि परदेशी राहणाऱ्या सर्व नागरिकांना तर दिलाच, पण तेच शब्द तेच हावभाव शत्रू राष्ट्राला धमकीवजा इशारा होते हे ही भारताने आणि जगाने पहिले, ऐकले आणि अनुभवले! 

कालच्या या बावीस मिनिटांच्या संबोधनानंतर भारतातला प्रत्येक नागरीक आश्वस्त झाला असेल की यापुढे दहशतवादाची आणि दहशतवाद पसरवणाऱ्यांची खैर केली जाणार नाही. हे लोक जिथे कुठे लपून बसले असतील तिथे घुसून त्यांना यमसदनी पाठवले जाईल. 

या operation सिंदूरच्या यशानंतर आणि कालच्या भाषणात माननीय पंतप्रधान यांनी शत्रू राष्ट्राला धमकीवजा इशारा दिल्यानंतर परत शत्रू राष्ट्र काही कागाळी करणारच नाही आणि चुकून केलीच तर या operation सिंदूरचा पुढचा टप्पा शत्रू राष्ट्राला यापेक्षा कठोर शिक्षा करेल अशी अपेक्षा ठेवून हा लेखनाचा उद्योग आजच्या पुरता थांबवतो. 

जय हिंद 

दिवस एकशे तेहेतीसवा पान एकशे तेहेतीसवे 

विठ्ठलवाडी, पुणे  


Wednesday, 1 January 2025

हास्याच्या पुराचा नवा पत्ता : मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी

मुक्काम पोस्ट बर्लिन:

इंग्लंडवर हल्ला करण्याची योजना हिटलर गोबेल्सबरोबर जर्मन भाषेत बोलत ठरवत आहे. आणि अचानक आकाशवाणी होते, "वातावरण निर्मिती छान झाली आहे, आता सर्व पात्रे मराठीतच बोलतील!" मग हिटलर आणि गोबेल्स जर्मन accentमध्ये मराठी बोलू लागताच परत एकदा आकाशवाणी होते, "सर्व पात्रे शुद्ध मराठीतच बोलतील!" मग काय करता? हिटलर आणि गोबेल्स शुद्ध मराठीत बोलत इंग्लंडवरील हल्ल्याची योजना ठरवू लागतात. 

आणि ती योजना जर्मन सैनिकांचे कपडे घातलेले ब्रिटिश हेर phone करून इंग्लंडला कळवतात. 

मुक्काम पोस्ट लंडन:

एक telephone operator जर्मनीवरून आलेला तो call विंस्टन चर्चिलला देतो आणि तिथेही तीच, "मराठीत बोला!" ही आकाशवाणी होते तेव्हा चर्चिल म्हणतो, "माझं नाव आहे ते, त्याचं काय भाषांतर करणार?"

अशा धमाल प्रसंगांनी चालू होतो तो एक भन्नाट चित्रपट म्हणजे आज दिनांक ०१/०१/२०२५ रोजी प्रदर्शित झालेला "मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी." 

प्रशांत दामले, सुनील अभ्यंकर, वैभव मांगले, मनमीत पेम, आनंद इंगळे, अद्वैत दादारकर, गीतांजली कुलकर्णी, दीप्ती लेले, गणेश मयेकर, प्रणव रावराणे, ऋतिका श्रोत्री, राजेश मापूसकर असे दिग्गज कलाकार असलेला हा चित्रपट दोनच तासांचा असला तरी त्यातल्या अफाट विनोदी प्रसंगांची एक साखळी प्रक्रिया अर्थात chain reaction चित्रपट रसिकांना पुढील दोन दशके तरी नक्कीच हसवत ठेवेल!

आज City Pride कोथरूड इथे चित्रपटातील काही कालवंत उपस्थित होते आणि चित्रपट संपल्यावर ते पडद्यासमोरील मंचावर आले तसा सर्व उपस्थित प्रेक्षकांना सुखद धक्का बसला. त्या सर्वांनी प्रेक्षकांबरोबर संवाद साधला. प्रेक्षकांनीही त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यानंतर ते सर्व कलावंत प्रेक्षकांबरोबर संवाद साधत असताना मी सुनील अभ्यंकर यांना "दिग्या काका!" अशी हाक मारल्यावर त्यांनी चमकून माझ्याकडे पहिले. २०१२ साली प्रदर्शीत झालेली मालिका 'एका लग्नाची दुसरी गोष्ट' यात सुनील अभ्यंकर यांनी साकारलेल्या पात्राचे नाव 'दिगंबर काळे' असलं तरी ते दिग्या काका म्हणूनच प्रसिद्ध झाले! त्यांच्याबरोबर एक selfie घेतला. 


सुनील अभ्यंकर यांच्याबरोबर बोलताना नुकताच प्रदर्शित झालेल्या 'आउट हाऊस' या हिन्दी चित्रपटाचाही उल्लेख केला आणि त्यांची त्यातील भूमिकाही आवडली हे त्यांना सांगितले. त्यांच्या भूमिका असलेले एकामागे एक प्रदक्षित झालेल्या दोन्ही चित्रपटांतील त्यांच्या भूमिका आवडल्याचे त्यांना सांगून आम्ही त्यांचा निरपो घेतला. 

ही blogpost वाचनाचा उद्योग करणाऱ्या तुम्ही सर्व रसिक हा चित्रपट OTTवर येण्याची वाट न पाहता चित्रपट गृहात जाऊनच बघाल ही अपेक्षा ठेवून आजच्या पुरता हा लेखनाचा उद्योग मी थांबवतो. 

सर्व वाचकांना नवीन वर्षाच्या अनेकोत्तम हार्दिक शुभेच्छा!

दिवस पहिला पान पहिले. 

०१/०१/२०२५ 

विठ्ठलवाडी, पुणे