Tuesday, 13 May 2025

ती बावीस मिनिटे


कालची संध्याकाळची ती बावीस मिनिटे देशाने आणि जगाने काय पाहिले, काय अनुभवले? माझ्या देशाचे पंतप्रधान, ७५ वर्षांचे तरूण पंतप्रधान देशाला आणि जगाला संबोधत होते. बावीस एप्रिल रोजी सीमेपलिकडल्या दहशतवाद्यांनी केलेल्या नृशंस हत्याकांडाचा बदला घेऊन झाल्यावर, शत्रू राष्ट्राला पुरेशी अद्दल घडवल्यानंतर आणि तिथल्या दहशतवादाच्या कारखान्यांना आपल्या सशस्त्र दलांनी, आपल्या नौदल, वायूदल आणि लष्कराने नष्ट केल्यानंतर ते देशाला आणि जगाला संबोधत होते. त्यांचे भाषण कौशल्य तर ते गुजरातचे मुख्यमंत्री असल्यापासूनच भारताने आणि जगाने पाहिले होते. पण काल, दिनांक बारा मे रोजी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात जो आवेश, जो जोर होता, तो क्वचितच कधी जनतेसमोर आला होता. 

पहलगामला अनेक भारतीय महिलांचे सौभाग्य अतिरेक्यांनी नष्ट केले, स्त्रियांचे सौभाग्य लेणे, म्हणजे हिंदीत ज्याला मांग का सिंदूर म्हणतात, ते नष्ट केले म्हणूनच भारताने दहशतवादाविरुद्ध केलेल्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या कारवाईला Operation सिंदूर हे नाव माननीय पंतप्रधानांनीच सुचवले असे म्हणतात. आणि या operation सिंदूरची उद्दिष्टे साध्य झाल्यानंतर शस्त्रविरामही केला. पण कालच्या भाषणात त्यांनी देशाला आश्वस्त करण्याबरोबरच दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या लोकांना ठणकावून सांगितले की भारतातला कोणताही दहशतवादी हल्ला हा act of war आहे असे समजले जाईल आणि त्याला तोडीस तोड प्रत्युत्तर दिले जाईल हा स्पष्ट संदेश दिला! Operation सिंदूर संपले नाहीये, तात्पुरते स्थगित केले आहे, आणि सीमेपालिकडून परत काही कागाळी केली गेली तर तशा कुरापती करणाऱ्यांची खैर केली जाणार नाही हा नि:संदिग्ध इशारा कालच्या भाषणात होता. 

यापूर्वी कोणत्याही देशाच्या प्रमुखाने दहशतवादाला जोपासणाऱ्या लोकांना अशाप्रकारचा संदेश दिल्याचे माझ्या तरी स्मरणात नाही. या भाषणातली वाक्ये तरी कशी निवडक होती ते पहा, "Terrorism and talks can not happen simultaneously", "Now the talks will be only about POJK.", "खून और पानी एकसाथ नही बह सकता|", "Operation सिंदूर अब आतंक के खिलाफ भारत की नीती है, new normal है|", "हम हर उस जगह जा कर कठोर से कठोर कारवाई करेंगे जहा से आतंक की जडे निकलती है|" या सगळ्यांबरोबरच शत्रू राष्ट्र अण्वस्त्रे वापरण्याची जी धमकी देत असे त्या धमकीलाही माननीय पंतप्रधान यांनी तितकेच रास्त उत्तर दिले. 

हे भाषण काल सर्वांनीच पहिले ऐकले असेल, त्यामुळे त्याच्या तपशीलात मी जास्त जात नाही. पण दिनांक सहा - सात मे यामधील रात्र ते शस्त्रसंधी होईपर्यंत भारताच्या सशस्त्र दलांनी शत्रू राष्ट्राला जी अद्दल घडवली आहे तशी अद्दल, त्यापेक्षा जास्त कठोर शिक्षा दहशतवाद पोसणाऱ्या सर्वाना भविष्यात होऊ शकते असा दिलासा माननीय पंतप्रधान यांनी भारताच्या भारतात आणि परदेशी राहणाऱ्या सर्व नागरिकांना तर दिलाच, पण तेच शब्द तेच हावभाव शत्रू राष्ट्राला धमकीवजा इशारा होते हे ही भारताने आणि जगाने पहिले, ऐकले आणि अनुभवले! 

कालच्या या बावीस मिनिटांच्या संबोधनानंतर भारतातला प्रत्येक नागरीक आश्वस्त झाला असेल की यापुढे दहशतवादाची आणि दहशतवाद पसरवणाऱ्यांची खैर केली जाणार नाही. हे लोक जिथे कुठे लपून बसले असतील तिथे घुसून त्यांना यमसदनी पाठवले जाईल. 

या operation सिंदूरच्या यशानंतर आणि कालच्या भाषणात माननीय पंतप्रधान यांनी शत्रू राष्ट्राला धमकीवजा इशारा दिल्यानंतर परत शत्रू राष्ट्र काही कागाळी करणारच नाही आणि चुकून केलीच तर या operation सिंदूरचा पुढचा टप्पा शत्रू राष्ट्राला यापेक्षा कठोर शिक्षा करेल अशी अपेक्षा ठेवून हा लेखनाचा उद्योग आजच्या पुरता थांबवतो. 

जय हिंद 

दिवस एकशे तेहेतीसवा पान एकशे तेहेतीसवे 

विठ्ठलवाडी, पुणे  


Wednesday, 1 January 2025

हास्याच्या पुराचा नवा पत्ता : मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी

मुक्काम पोस्ट बर्लिन:

इंग्लंडवर हल्ला करण्याची योजना हिटलर गोबेल्सबरोबर जर्मन भाषेत बोलत ठरवत आहे. आणि अचानक आकाशवाणी होते, "वातावरण निर्मिती छान झाली आहे, आता सर्व पात्रे मराठीतच बोलतील!" मग हिटलर आणि गोबेल्स जर्मन accentमध्ये मराठी बोलू लागताच परत एकदा आकाशवाणी होते, "सर्व पात्रे शुद्ध मराठीतच बोलतील!" मग काय करता? हिटलर आणि गोबेल्स शुद्ध मराठीत बोलत इंग्लंडवरील हल्ल्याची योजना ठरवू लागतात. 

आणि ती योजना जर्मन सैनिकांचे कपडे घातलेले ब्रिटिश हेर phone करून इंग्लंडला कळवतात. 

मुक्काम पोस्ट लंडन:

एक telephone operator जर्मनीवरून आलेला तो call विंस्टन चर्चिलला देतो आणि तिथेही तीच, "मराठीत बोला!" ही आकाशवाणी होते तेव्हा चर्चिल म्हणतो, "माझं नाव आहे ते, त्याचं काय भाषांतर करणार?"

अशा धमाल प्रसंगांनी चालू होतो तो एक भन्नाट चित्रपट म्हणजे आज दिनांक ०१/०१/२०२५ रोजी प्रदर्शित झालेला "मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी." 

प्रशांत दामले, सुनील अभ्यंकर, वैभव मांगले, मनमीत पेम, आनंद इंगळे, अद्वैत दादारकर, गीतांजली कुलकर्णी, दीप्ती लेले, गणेश मयेकर, प्रणव रावराणे, ऋतिका श्रोत्री, राजेश मापूसकर असे दिग्गज कलाकार असलेला हा चित्रपट दोनच तासांचा असला तरी त्यातल्या अफाट विनोदी प्रसंगांची एक साखळी प्रक्रिया अर्थात chain reaction चित्रपट रसिकांना पुढील दोन दशके तरी नक्कीच हसवत ठेवेल!

आज City Pride कोथरूड इथे चित्रपटातील काही कालवंत उपस्थित होते आणि चित्रपट संपल्यावर ते पडद्यासमोरील मंचावर आले तसा सर्व उपस्थित प्रेक्षकांना सुखद धक्का बसला. त्या सर्वांनी प्रेक्षकांबरोबर संवाद साधला. प्रेक्षकांनीही त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यानंतर ते सर्व कलावंत प्रेक्षकांबरोबर संवाद साधत असताना मी सुनील अभ्यंकर यांना "दिग्या काका!" अशी हाक मारल्यावर त्यांनी चमकून माझ्याकडे पहिले. २०१२ साली प्रदर्शीत झालेली मालिका 'एका लग्नाची दुसरी गोष्ट' यात सुनील अभ्यंकर यांनी साकारलेल्या पात्राचे नाव 'दिगंबर काळे' असलं तरी ते दिग्या काका म्हणूनच प्रसिद्ध झाले! त्यांच्याबरोबर एक selfie घेतला. 


सुनील अभ्यंकर यांच्याबरोबर बोलताना नुकताच प्रदर्शित झालेल्या 'आउट हाऊस' या हिन्दी चित्रपटाचाही उल्लेख केला आणि त्यांची त्यातील भूमिकाही आवडली हे त्यांना सांगितले. त्यांच्या भूमिका असलेले एकामागे एक प्रदक्षित झालेल्या दोन्ही चित्रपटांतील त्यांच्या भूमिका आवडल्याचे त्यांना सांगून आम्ही त्यांचा निरपो घेतला. 

ही blogpost वाचनाचा उद्योग करणाऱ्या तुम्ही सर्व रसिक हा चित्रपट OTTवर येण्याची वाट न पाहता चित्रपट गृहात जाऊनच बघाल ही अपेक्षा ठेवून आजच्या पुरता हा लेखनाचा उद्योग मी थांबवतो. 

सर्व वाचकांना नवीन वर्षाच्या अनेकोत्तम हार्दिक शुभेच्छा!

दिवस पहिला पान पहिले. 

०१/०१/२०२५ 

विठ्ठलवाडी, पुणे